मुंबई : कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खासदार राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजीच कोरोना त्सुनामी सारखे संकट असल्याचा इशारा दिला होता. परंतु मोदींपासून देवेंद्र फडणवींसापर्यंत भाजप नेत्यांनी आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही, असे म्हणत दुर्लक्ष केले. परिणामी आज देशात दररोज ४ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण तसेच ४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि बेजबाबदार कारभार कारणीभूत आहे. कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणाऱ्या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करीत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगाविला आहे. पटोले म्हणाले, ‘‘कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून, मोदी सरकारने या संदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे घेऊन राज्यांना रामभरोसे सोडले. मोदींकडे ठोस धोरण नाही आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने भाजप नेते सैरभेर झाले आहेत. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेह जाळण्यासाठी जागा नाही, हे विदारक दृश्य जगभरातील माध्यमे दाखवत आहेत. ७० वर्षांत कधी भारताची झाली नव्हती एवढी नाचक्की मोदींच्या मनमानी कारभारामुळे झाली आहे.’’ केंद्राने राज्यांना भरभरून रेमडेसीवर, ऑक्सिजन व वैद्यकीय मदत पुरवली, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत टास्क फोर्स नेमून सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तबच केले आहे. पीएम केअरमधून ऑक्सिजन प्लंट उभारण्याच्या फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात केंद्राने महाराष्ट्रात एकही ऑक्सिजन प्लंट उभारला नाही, असेही पटोले म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.