यवतमाळ ः ‘‘नवरा गेल्यावर तीन मुलं, आजारी दीराचा सांभाळ या दोन एकरांच्या तुकड्यावरच करते; वलीताची जरा सोय झाली तर बरं होईल, असं वाटतं. म्हणून गेल्या कित्येक वरसापासून विहिरीसाठी अर्जावर अर्ज केले; पण कायबी फायदा झाला नाई ताई..! तथून विश्वास पटला की सरकार आमच्या गरिबासाठी हायेच नाई,’’ असे सांगताना विधवा शेतकरी संगीता काळे यांचे डोळे पाण्याने डबडबले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हल्लाबोल मोर्चा यवतमाळ जिल्ह्यातील कळंबवरून पुढे मार्गस्थ झाला. वाटेत संगीता काळे या महिलेच्या शेताला मोर्चातील खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, चित्रा वाघ यांनी भेट दिली.
यावेळी संगीता काळे या कापूस वेचत होत्या. संगीता काळे यांनी प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाचा पाढाच यावेळी वाचला. गेल्या अनेक वर्षांपासून विहिरीसाठी अर्ज दिला. परंतु राजकीय पाठबळ नसल्यामुळे आजवर विहिरीची मागणी पूर्णत्वास गेली नाही, अशी खंत संगीता काळे यांनी व्यक्त केली.
गेल्या चार पाच वर्षांपासून विहिरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला; परंतु आजवर काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे यापुढे अर्ज करावा किंवा नको अशी मानसिकता झाल्याचे संगीता काळे यांनी सांगितले.
त्यांच्या शेतशिवाराला भेट देण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कळंब ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे भेडसावणाऱ्या प्रश्नांची जंत्रीच मांडली. त्यामध्ये वीज, पाणी, खराब रस्ते, शेतरस्ते यांसारख्या समस्यांचा समावेश होता.