जळगाव ः जिल्ह्यात यंदा रब्बी पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी हाती येत असून, गव्हाची सरासरी उत्पादकता गाठण्यात यश आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. काळ्या कसदार जमिनीत यंदा पीक व्यवस्थित आले असून, एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन अनेक शेतकऱ्यांना मिळाले आहे.
जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र कमी होत असले, तरी केळी पीकपट्ट्यात बेवड म्हणून गव्हाचे पीक शेतकरी घेतात. तापी काठावरील गावांमध्ये गहू पीक अधिक असते. यंदाही यावल, रावेर, चोपडा व मुक्ताईनगर भागात पेरणी अधिक होती. यापाठोपाठ जळगाव, पाचोरा, जामनेर भागात गहू पेरणी झाली होती. एकूण क्षेत्र सुमारे २५ हजार हेक्टर होते. नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या गव्हाची मळणी झाली आहे. डिसेंबरमध्ये पेरणी केलेला गहू कापणीच्या अवस्थेत येत आहे.
चोपडा, यावल भागातील गव्हाखालील कमाल क्षेत्र मळणी होऊन रिकामे झाले आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या मशिनद्वारे मळणीला प्राधान्य दिले. त्यात कापणी व गहू गोळा करण्याचे श्रम वाचले. शिवाय काम लवकर झाले. वेळेची बचत झाल्याने गहू घरात लवकर पोचला. सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यात मध्यंतरी वारा सुटल्याने काही ठिकाणी गहू आडवा झाला आहे. त्यात दाणे बारीक पडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हलक्या, खडीयुक्त जमिनीत गव्हाचे उत्पादन एकरी आठ क्विंटलपर्यंत आहे. काळ्या कसदार जमिनीत मात्र सरासरी उत्पादन आले आहे. मागील वर्षीही एकरी १० ते १२ क्विंटल एवढे उत्पादन तापीकाठालगतच्या भागात शेतकऱ्यांना मिळाले होते.
गहू मळणीनंतर रावेर, यावल भागात शेतकऱ्यांनी केळी लागवडीसाठी जमीन तयार करायला सुरवात केली आहे. जमीन तयार करून या महिन्याच्या मध्यात किंवा अखेरीस आंबेबहार केळी लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. रावेरात आंबेबहार केळी लागवड अधिक होईल, असे सांगण्यात आले.