जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक वाढत आहे. दर स्थिर असून, सर्वाधिक आवक चोपडा बाजार समितीमध्ये होत आहे. १२५० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर लोकवन गव्हाला आहे.
यंदा गव्हाची सरासरी क्षेत्रावर पेरणी झाली होती. पेरणीचे क्षेत्र तापी काठावरील चोपडा, यावल, रावेर या भागात अधिक होते. मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा भागातही बऱ्यापैकी पेरणी यंदा झाली होती. क्षेत्र २३ हजार हेक्टरपर्यंत होते. गहू उत्पादनही एकरी १० क्विंटलपर्यंत येत आहे. काळ्या कसदार जमिनीमध्ये अधिकचे उत्पादन येत असून, हलक्या, खडीमिश्रित जमिनीत एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याची माहिती मिळाली.
गव्हाची मळणी अजूनही अनेक भागात सुरू आहे. दिवाळीनंतर पेरणी केलेल्या गव्हाची मळणी पूर्ण झाली आहे. परंतु डिसेंबरमध्ये पेरणी केलेल्या गव्हाची मळणी अजून झालेली नाही. परंतु जिल्हाभरातील बहुतांश क्षेत्रावरील गहू मळणीवर आला आहे. काही ठिकाणी कापणी पूर्ण झाली असून, गव्हाचे ढीग लावले आहेत. मागील १८ ते २० दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापणी केली नाही.
कापणीनंतर पाऊस आला तर अधिक नुकसानीची भीती शेतकऱ्यांना होती. अशातच कापणी रखडली. बुधवारी (ता. २१) वातावरण निरभ्र असल्याने कापणी व मळणीची कामे गतीने सुरू झाली. अनेक शेतकऱ्यांनी मळणी केल्याने बाजार समितीमध्येही आवक वाढली आहे.
चोपडा बाजार समितीमध्ये चुकारे मिळण्याची पद्धत सुकर असल्याने शेतकरी या बाजार समितीमध्ये गहू नेत आहेत. जळगाव व धरणगावचे शेतकरीदेखील चोपडा बाजार समितीत गहू नेत आहेत. अमळनेर व पाचोरा बाजार समितीमध्येही चांगली आवक सुरू असून, या तिन्ही बाजार समित्यांमध्ये रोज मिळून दोन हजार क्विंटल गव्हाची आवक होत आहे.
रावेर व मुक्ताईनगरमधील काही शेतकऱ्यांचा गहू बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील व्यापाऱ्यांनी जागेवरच खरेदी केला आहे. लोकवन प्रकारच्या गव्हास तेथील व्यापाऱ्यांनी १२०० ते १४०० रुपये क्विंटलचा दर दिला आहे. गव्हाची मागणी बरी असल्याने लिलावही हातोहात होत आहेत. दर स्थिर असून, मार्चअखेरीमुळे चाकरमानी दादरप्रमाणेच गव्हाचीदेखील वर्षभरासाठी खरेदी करून घेत आहेत. त्यामुळे दर्जेदार गव्हाला चांगली मागणी आहे.