जळगाव : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असून, यामुळे दूध उत्पादक, शेतकरी, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे अमळनेर तालुक्यात असून, यापाठोपाठ पारोळा तालुक्यात ही समस्या आहे. जिल्ह्यात जवळपास २८ टॅंकर सुरू आहेत.
भुसावळ, भडगावमध्ये प्रत्येकी एक गाव टंचाईग्रस्त आहे. अमळनेरमधील २५ गावांमध्ये टंचाई आहे. पारोळ्यात सुमारे १६ गावे टंचाईग्रस्त आहेत. चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोलमध्येही पाणी टंचाईची समस्या आहे. जिल्ह्यात जवळपास २८ टॅंकर सुरू आहेत. मागील आठवड्यात दोन टॅंकर वाढविले आहेत. तसेच आणखी १० गावांकडून टॅंकर मागणीचे प्रस्ताव आले आहेत. तहसीलदारांना टॅंकर मंजुरीचे अधिकार दिले आहेत. परंतु, तरीही टॅंकर मंजुरीची कार्यवाही हव्या त्या गतीने होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अमळनेर व पारोळ्यात पर्जन्यमान कमी होते. यातच गिरणा व अनेर नदीलाही पूर आले नव्हते. यामुळे सद्यःस्थितीला अनेर व गिरणा काठावरील सुमारे ४० गावांमध्येही पाणीटंचाईची समस्या ऐरणीवर आली आहे. गिरणा नदीला अलीकडेच गिरणा धरणातून पाणी सोडले होते. हे पाणी जळगाव व धरणगाव तालुक्यातील शेवटच्या टोकातील गावांमध्येही पोचले होते. यामुळे टंचाईची समस्या काहीशी दूर होईल, अशी स्थिती असली तरी जूनमध्ये पाणीटंचाई भासणारच आहे.
गिरणा काठावरील गावांमध्ये दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला आहे. अनेर काठावरील गावांमध्येही असाच निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. भडगाव तालुक्यातील लिंबाच्या बागांना टॅंकरने पाणी काही शेतकऱ्यांनी दिले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. बात्सर, खेडगाव या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्थिती बरी आहे. परंतु उर्वरित गावांमध्ये स्थिती बिकट बनली आहे. खेडगाव शिवारातही शेतशिवारातील विहिरी कोरड्या पडत आहेत.
धरणगाव व जळगाव तालुक्यांत गिरणा काठावरील गावांमध्ये शिवारातील कूपनलिकांची पाणीपातळी घटली आहे. मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून, पुढे पूर्वहंगामी कापसाची लागवड रखडणार आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने टॅंकर व तात्पुरत्या योजनांबाबत गतीने कार्यवाही करावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.