सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाने दिलासा दिला. यामुळे भूजलपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे ७० हून अधिक गावे आहेत. मात्र, त्यापैकी सुमारे २५ ते ३० गावांवर पाणीटंचाईचे सावट आहेत. गावात वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी असून देता येत नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.
जत तालुक्यात सुमारे १२३ गावे आहेत. तालुक्यात सर्वदूर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने
शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे भूजलपातळी वाढली
आहे, परंतु जत तालुक्याच्या २५ ते ३० गावांत कमी अधिक पाऊस झाला. पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे या भागांत पाणीटंचाईचे सावट आहे. आत्तापासून पाणीटंचाई भासू लागल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी कमी पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
तालुक्याच्या उर्वरित भागांत पाणीटंचाई नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे पिके चांगली आहेत. मात्र, सातत्याने वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना वेळेत पाणी देण्यासाठी कसरत करावी लागते आहे. त्यामुळे शेतीपंपासाठी लागणारा वीजपुरवठा कायम सुरू ठेवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, महावितरण कंपनी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.