यवतमाळ : हागणदारीमुक्तीसाठी सरसावत पाथ्रड गोळे गावातील किराणा व्यावसायिकांनी स्वच्छतागृह नसलेल्या किंवा असूनही त्यांचा वापर न करणाऱ्या कुटुंबांना किराणा साहित्य न देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे तसा फलक या व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांत लावला आहे.
पाथ्रड गोळे हे गाव हागणदारीमुक्त व्हावे याकरीता प्रयत्न होत आहेत. ज्यांना अनुदानावरील स्वच्छतागृहाचा लाभ मिळत नाही, त्यांना स्वच्छतागृहाकरीता एक शिट तसेच तीन पोते सिमेंट देण्यात येत आहे. या माध्यमातून गावात सुमारे ४०० स्वच्छतागृहांची उभारणी झाली आहे.
परंतु काही नागरिक जाणीवपूर्वक याचा वापर करीत नाहीत. गावातील मुख्यमंत्रिदूत किरण घोरफडे, सरपंच सविता अडमते, उपसरपंच जितेंद्र गायनर, रवी गावंडे, हनुमान अडमते व ग्रामसेवक सहारे हे गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून स्वच्छतागृह वापराबाबत जनजागृती करीत आहेत. विशेष म्हणजे पर्यटनस्थळ असा लौकिक असलेले पाथ्रड गाव हे आदर्श गावाच्या यादीतदेखील आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून ४०० स्वच्छतागृहे बांधून तयार आहेत.
या मोहिमेला आणखी बळ मिळावे या उद्देशाने गावातील दुकानदार रामकृष्ण सावळे यांनी एक उपक्रम राबविला. ज्यांच्या घरी स्वच्छतागृह नाही किंवा असूनही वापरत नाही, अशांना किराणा साहित्य न देण्याचा फलक त्यांनी दुकानाच्या दर्शनीय भागात लावला आहे. नुकसान झाले तरी चालेल, मात्र गावहितासाठी हा निर्णय योग्य असल्याचे रामकृष्ण सावळे यांनी सांगितले.