जिल्ह्याच्या कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक अशी एकूण ३५१ पदे अाहेत. यापैकी २४५ पदे भरलेली असून तब्बल १०६ पदे रिक्त अाहेत.
या रिक्त असलेल्या पदांमध्ये प्रामुख्याने थेट शेतकऱ्यांशी संपर्क असणारी कृषी सहायकाची ६४ तर पर्यवेक्षकाची १७ पदे भरलेली नाहीत. मंडळ कृषी अधिकारी या पदाचीही अशीच स्थिती अाहे. मंजूर असलेल्या १९ पैकी १२ पदे रिक्त अाहेत.
जिल्ह्यात सात तालुके असून त्यापैकी केवळ तीन ठिकाणी पूर्ण वेळ तालुका कृषी अधिकारी अाहेत. उर्वरित चार ठिकाणचा पदभार देऊन कार्यालयाचे कामकाज केले जात अाहे. बाळापूरसारखा तालुका तर वर्षानुवर्षे मंडळ अधिकारी सांभाळत अाहेत. अशीच अवस्था बार्शिटाकळीची होती. तेथे अाता पूर्ण वेळ अधिकारी नेमण्यात अाला. तेल्हारा तालुक्यात पात्र अधिकारी मिळत नाही. अकोटमध्ये तर पदभार घेण्यासाठी कर्मचारी नाहीत, एवढी बिकट परिस्थिती तयार झाली अाहे. मूर्तिजापूर तालुक्याचीही स्थिती वेगळी नाही.
राज्याच्या नकाशावर कृषी क्षेत्रात अकोला मुख्य ठिकाण अाहे. या जिल्ह्यात खारपाणपट्टा असल्याने शेतीच्या समस्या वेगळ्या अाहेत. असे असताना वर्षानुवर्षे अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवली जात अाहेत. याबाबत कृषी विभाग, लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी करूनही पदे भरली जात नसल्याने एकूणच योजनांच्या अंमलबजावणीसाठी मोठी अोढाताण सुरू अाहे.
अकोट तालुक्यात तर योजनांचा पार बोऱ्या वाजला. तेथील अहवालच जिल्हा मुख्यालयात पाठवायला कुणी नाही. गत काळात झालेल्या बदल्यांमध्ये काही तालुका कृषी अधिकारी जिल्ह्याला मिळाले. दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी बदलीवर अकोला जिल्ह्यात येणार होते. परंतु सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी रिलीव्हर नसल्याने तेथील वरिष्ठ अधिकारी त्यांना सोडायला तयार नाहीत.