वाशीम : यंदाच्या हंगामात २६ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत विक्री केलेल्या तुरीचे कोट्यवधींचे चुकारे थकले होते. एकट्या वाशीम जिल्ह्यात ही रक्कम ८५ कोटी ७३ लाख एवढी होती. हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
उपरोक्त काळात जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ७८० क्विंटल तूर प्रशासनाने खरेदी केली आहे. बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्हे मिळून २२४ कोटींचा निधी मिळाला आहे.बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत शासनाने नाफेडच्या सहकार्याने ३१ ऑगस्टपर्यंत तुरीचे मोजमाप करून घेतले. दरम्यान, महिनाभर चुकारे रखडले होते. याबाबत वारंवार निधी उपलब्ध करून देण्याची शासनाकडे मागणी झाली. अखेरीस हा निधी जिल्ह्यांना वळता करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या निधीचे धनादेश तयार करून संबंधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खरेदी-विक्री संघात संपर्क साधावा लागेल. तेथे तूर विकल्याची पावती, आधार कार्ड, सातबारा उतारा सोबत नेल्यानंतर संबंधित अधिकारी पडताळणी करतील. कागदपत्रांची चाचपणी झाल्यानंतर धनादेश दिले जातील. वाशीम जिल्ह्यात वाशीम, अनसिंग, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, रिसोड या केंद्रावर तुरीची खरेदी झाली. एक लाख ६९ हजार क्विंटल तुरीची ८५ कोटी ७३ लाख ८९ हजार रुपये थकीत होते. शासनाकडून ही रक्कम देण्यात आली आहे.
शासनाने वाशीम, अकोला आणि जिल्ह्यांसाठी एकूण २२४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यात वाशीमचा वाटा ८५ कोटी ७३ लाख एवढा आहे. सुमारे ५५ कोटी रुपये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहेत तर बुलडाणा जिल्ह्यासाठी ८३ कोटी मिळाले असून हा निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे.