अकोला : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात सर्वच पिकापासून नुकसान झेललेल्या शेतकऱ्यांना आता तुरीच्या पिकावर अपेक्षा लागलेली होती. हे पीक कुठे शेंगा परिपक्व तर कुठे कापणीला आले आहे. अशा स्थितीत पावसाळी वातावरण तयार झालेले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तुरीच्या शेंगावर अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी पीक वाळत आहे. कापणीला आलेले पीक अशा वातावरणात कापावे की, नाही याची चिंता वाढलेली आहे.
सध्या वऱ्हाडातील तीन ही जिल्हे मिळून सुमारे पावणे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड झालेली आहे. सोयाबीन व तुरीचे आंतरपीक शेतकऱ्यांनी पेरले होते. सोयाबीनची अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यात शेतकऱ्यांना जेमतेम उत्पादकता आलेली आहे. त्यापूर्वी मूग, उडीद, ज्वारी तसेच कापसाच्या पिकापासूनही मोठे नुकसान झाले होते.
आता शेतात तुरीचे पीक उभे आहे. परतीच्या पावसामुळे तुरीचे उत्पादन चांगले येण्याची सर्वच शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेली आहे. कोरडवाहू पट्ट्यात तुरीचे पीक शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. जूनच्या सुरुवातीलाच लागवड केलेल्या शेतांमध्ये तूर कापणीसाठी तयार झाली आहे. सध्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण बनलेले आहे. काही ठिकाणी तर पावसाच्या सरी सुद्धा झाल्या. अशा परिस्थितीत तुरीची कापणी कशी करावी हा पेच बनलेला आहे.
दरम्यान, कोरडवाहू पट्ट्यात तुरीच्या पिकाला उधळीने पोखरले आहे. हिरवेगार दिसणारे झाड दोन-तीन दिवसांत वाळलेले बघायला मिळत आहे.
प्रतिक्रिया पाच एकरांत सोयाबीन व तूर लागवड केली होती. तुरीला मोठ्या प्रमाणावर शेंगाही लागलेल्या आहेत. आता तूर काढणीला आली असता सध्याच्या ढगाळ व पावसाच्या वातावरणामुळे तुरीचे पीकही आता हातात येईल की, नाही या बाबत शंका आहे. -भास्कर गोरे, शेतकरी, दानापूर, जि. अकोला
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.