सांगली : जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा तुरीचे क्षेत्र वाढले आहे. पीक वाढीच्या काळात आणि फुलोरा अवस्थेत असताना अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात सुमारे २० ते ३० टक्के घट होण्याची भीती तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यात तुरीचे उत्पादन घेतले जाते. सांगली जिल्ह्यात १० हजार ४५ हेक्टरवर पेरा झाला असून, जत तालुक्यात ७ हजार ५१० हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. जत तालुक्यात तुरीचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. यंदा परतीच्या अतिवृष्टीमुळे तुरीला आलेली फुले झडून गेली आहेत. आता शिवारात नुसत्या तुरकाट्या उभ्या आहेत. उत्पादनात मोठी घट होणार आहे. आता करायचं काय, पैका कुठून आणायचा, अशी व्यथा जत तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची आहे. शेतकरी संभाजी पाटील म्हणाले, ‘‘जुलै महिन्यात पडलेल्या पावसावर तूर पिकांची पेरणी केली. गेल्यावर्षी परतीचा पाऊस बरा पडला. पीक चांगले आले होते. उत्पादन वाढेल, अशी आशा होती. रोगराई होऊ नये म्हणून प्रतिकूल हवामानामुळे चार ते पाच फवारणी केल्या आहेत. जास्त खर्च केला आहे. तुरीला फुलं आली होती. पण, परतीचा पाऊस सुरू झाला. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. जोराचा पाऊस झाल्याने तुरीची फुलं झडून गेली आहेत.’’ पाच्छापूरचे शेतकरी बी. एस. पाटील म्हणाले, की पोषक वातावरण असल्याने तूर पीक चांगले बहरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीची फूलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.