हैदराबाद ः तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांनी विविध बॅंकांमधून घेतलेले १६ हजार कोटींचे कर्ज माफ केले अाहे. कर्जमाफीमुळे राज्यातील सुमारे ३५.२९ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला अाहे. एकही शेतकरी कर्जमाफी योजनेतून चुकलेला नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्य विधानसभेत दिली.
कर्जमाफीसंदर्भात राज्य विधानसभेत झालेल्या चर्चेवेळी मुख्यमंत्री राव यांनी बुधवारी (ता. १) ही माहिती दिली. देशातील कोणत्याही राज्याने अाजपर्यंत सर्व प्रकारच्या बॅंकांमधून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ केलेले नाही; मात्र तेलंगणा असे एकमेव राज्य सरकार अाहे, ज्याने सर्व बॅंकांमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले अाहे, असा दावा मुख्यमंत्री राव यांनी केला अाहे.
सहकारी सोसायट्या, राष्ट्रीयीकृत बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बॅंका अाणि इतर बॅंकांमधून शेतकऱ्यांनी घेतलेले १६ हजार कोटी रुपयांचे कर्ज चार हप्त्यांत माफ करण्यात अाले अाहे. तसेच शेतकरीहिताच्या दृष्टीने शेतमालास हमीभाव दिला जात अाहे. शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न अाहेत, ते सोडविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अाहे. कोणताही शेतकरी जर कर्जमाफीपासून वंचित राहिला असल्याचे निदर्शनास अाणून द्या, त्याचे कर्जमाफ केले जाईल, असेही अावाहन त्यांनी विधानसभेतील सदस्यांना केले.
दरम्यान, बोगस बियाणेप्रकरणी सरकारने गंभीर दखल घेतली अाहे. बोगस बियाणेप्रकरणी अातापर्यंत सात लोकांना अटक करण्यात अाली अाहे. येत्या हिवाळी अधिवेशनात बोगस बियाण्यांवर प्रतिबंध घालण्याकरिता राज्य सरकारकडून अध्यादेश काढला जाईल, असे अाश्वासन मुख्यमंत्री राव यांनी दिले.
कर्जमाफी योजनेवर काँग्रेसचा अाक्षेप
सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ केल्याच्या राज्य सरकारच्या दाव्यावर तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीने अाक्षेप घेतला अाहे. राज्य सरकारने केवळ कर्जाची मूळ रक्कम माफ केली असून, शेतकरी सध्या कर्जावरील व्याज भरत अाहेत, असे प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अाणि काँग्रेसचे अामदार उत्तम कुमार रेड्डी यांनी राज्य सरकारच्या निर्दशनास अाणून दिले. कर्जमाफीसंदर्भात अापण अाठवडाभरात अहवाल सादर करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री राव यांनी, अहवाल सादर झाल्यानंतर त्याची शहानिशा करून रक्कम मंजूर केली जाणार असल्याचे अाश्वासन दिले.