बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झाले अाहेत. यातील असलेल्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करा, या मागणीसाठी शनिवारी (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बाजार समितीच्या वरवट बकाल येथील उपबाजारासमोर हंगामा अांदोलन करण्यात अाले.
संग्रामपूर तालुक्यात तूरखरेदी केंद्रावर झालेल्या घोळप्रकरणी स्वाभामानी शेतकरी संघटनेने वारंवार अांदोलने केली. त्यामुळे खरेदी-विक्री संघाच्या संचालकांसह व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात अाले. यात अारोपी असलेल्या व्यापाऱ्यांचे परवाने बाजार समितीने रद्द करण्याची मागणी संघटनेने केली अाहे.
मात्र अद्यापही त्यावर कारवाई झाली नसल्याने शनिवारी अांदोलन करण्यात अाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अाघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोल्हर, संतोष गाळकर, रोशण देशमुख, अनंता मानकर, रामदास भोपळे अादी कार्यकर्ते या अांदोलनात सहभागी झाले होते.
या अांदोलनाची दखल घेत बाजार समिती सभापती व सचिवांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्याचे सांगितले. संबंधित व्यापाऱ्यांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर २२ अाॅक्टोबरपर्यंत नियमानुसार व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल, असे लेखी अाश्वासन दिले.
ठेचा-भाकर आंदोलन करणार
शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापसाला भाव, सात-बारा कोरा करा या व इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी संघटना बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा-भाकर आंदोलन करणार आहे.