जळगाव : गुलाबी बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे अजूनही सुरूच आहेत. यातच ज्या क्षेत्रात कपाशीचे पीक काढून नष्ट केले तेथे काही अवशेष सापडले तर नुकसान ग्राह्य धरून पंचनाम्यात तशी नोंद केली जात आहे. आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यात चार लाख ७५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यातील सुमारे चार लाख हेक्टवरील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला.
जिल्ह्यात मध्यंतरी कृषी विभागाकडून बोंडअळीच्या नुकसानीसंबंधी अर्ज कपाशी बियाण्याच्या रॅपर व बिलासह स्वीकारले जात होते. पंचनाम्यांबाबत एच अर्ज बियाणे कायदानुसार स्वीकारले जात होते. याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नियोजन समितीच्या बैठकीत तक्रारी केल्या.
यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल, असे स्पष्ट केले. या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने कपाशीच्या नुकसानीसंबंधी ११ डिसेंबरपासून कार्यवाही सुरू केली. क्षेत्र मोठे व यंत्रणा तोकडी यामुळे पंचनाम्यांना उशीर होत आहे.
कृषी सहायक, तलाठी यांची १५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकच सहायक व तलाठी यांच्यावर तीन ते चार गावांमध्ये पंचनामे करण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाने गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कपाशी काढून क्षेत्र रिकामे करावे, पऱ्हाटी नष्ट करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक नष्ट केले. आता शेतात कपाशीच नसल्याने पंचनामे करण्यास काही ठिकाणी शासकीय कर्मचारी नकार देत आहेत. ते शेतात यायला नकार देतात, अशा तक्रारी आहेत.
जिल्ह्यात १० डिसेंबरपूर्वी काही ठिकाणी एच अर्जानुसार नुकसानग्रस्त कपाशीचे पंचनामे झाले. पण नंतर सरसकट पंचनामे सुरू झाले. आजघडीला तीन लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. आणखी लाखभर हेक्टरचे पंचनामे राहिले आहेत. त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून मिळाली.