भिलार, जि. सातारा : जागतिक बाजारपेठेतील मंदी, सातत्याने ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. उत्पादन असूनही मागणी कमी आणि दरातील तफावत, यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
तालुक्यातील लिंगमळा, मेटगुताड, अवकाळी, भिलार, गुरेघर या परिसरातील स्ट्रॉबेरीबरोबरच खिंगर, राजपुरी बरोबरच तळदेव आणि कुंभरोशी परिसरातही मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या वर्षी स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात वाढ झाली. परंतु, वातावरणातील बदल, ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ऐन हंगामात माल उशिरा मिळाला. त्यामुळे उत्पादित मालाला बाजारपेठेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर बहुतांशी वेळी ढगाळ हवामान राहिल्याने उत्पादनावर परिणाम झाला.
स्ट्रॉबेरी दिवसाला ५० ते ६० टन उत्पादित होते. यापैकी एक क्रमांकाचा बराचसा माल हा स्थानिक पाचगणी, महाबळेश्वर बाजारपेठेत पर्यटकांना वितरित होतो. २० टन माल हा बेंगलोर, मुंबई, पुणे, कलकत्ता या ठिकाणी पाठवला जातो. यातील उरलेला एक व दोन नंबरचा ३५ ते ४० टन माल हा येथील स्थानिक कंपन्या, सोसायट्या व स्थानिक व्यापारी जाम, सिरप, जेली, ज्यूस यासाठी खरेदी करतात.
यंदा जैन कंपनीने भिलारकडे माल खरेदीसाठी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची भिस्त सोसायट्या, स्थानिक कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर आहे. परंतु, स्थानिक जाम, जेली कंपन्यांनीही जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे कमी प्रमाणात माल खरेदी सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.