सातारा : शाश्वत पाणी उपलब्धतेसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ३२११ अर्ज प्राप्त झाले असून, आतापर्यंत ८१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानापोटी तीन कोटी ५६ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी जिल्ह्यात २००० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ही योजना सर्वसमावेशक झाल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता येऊ लागल्याने टप्प्याटप्प्याने प्रतिसाद वाढला आहे. सध्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ३२११ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये २६८६ अर्ज पात्र तर ४६१ अर्ज अपात्र ठरले असून, ५८ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी २३०२ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. १६७३ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ८५६ शेततळ्यांचे काम सुरू असून, ८१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी ७८९ शेततळ्यांसाठी तीन कोटी ५६ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात या योजनेला प्रतिसाद चांगला असून पश्चिमेकडील कऱ्हाड, वाई, सातारा तालुक्यांतूनही प्रतिसाद चांगला वाढला आहे. मात्र महाबळेश्वर, जावळी, पाटण या तालुक्यांत कमी प्रतिसाद मिळत आहे.
शाश्वत पाण्यासाठी ही योजना फायदेशीर असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. आखणी करून दिलेली व प्रत्यक्ष काम सुरू असलेली शेततळ्यांची कामे पूर्ण झाल्यावर जिल्ह्यात या योजनेत सुमारे चार हजार शेततळी पूर्ण होणार आहेत. यामुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.