नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून यंदा जिल्ह्यात सुमारे ६०० शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना १३ कोटी ६० लाखाचा निधी मिळाला आहे. अर्जाची संख्या मोठी आहे. त्यामुळे सोडतीतून लाभार्थी निवडले जाणार आहेत. गाय-म्हैस वाटप करण्याच्या योजनेतून जिल्ह्याला वगळण्यात आले. त्यामुळे त्याचे वाटप होणार नाही.
योजनेतून दहा शेळ्या व एका बोकडाच्या शेळीपालनासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला ५० टक्के म्हणजे ५१,७७३ रुपये, अनुसूचित जाती, जमाती व आदिवासी शेतकऱ्यांना ७५ टक्के म्हणजे ७७ हजार, ६५९ रुपयांचे अनुदान दिले जाते. एक हजार मांसल पक्षी कुक्कुटपालनासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला ५० टक्के म्हणजे १ लाख १२ हजार ५००, तर अनुसूचित जाती, जमाती व आदिवासी शेतकऱ्यांना ७५ टक्के म्हणजे १ लाख ६८ हजार ७५० रुपये अनुदान दिले जाते.
यंदा जिल्ह्यात शेळीपालन व कुक्कुटपालनासाठी मिळून सुमारे २१ हजार अर्ज आले आहेत. त्यातून अवघ्या सहाशे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे प्राप्त अर्जातील केवळ तीन टक्के लाभार्थ्यांना लाभ मिळेल. मात्र तीन टक्के लाभार्थ्यांनाच अनुदानापोटी १३ कोटी ६० लाख रुपये खर्च होईल. योजना सुरू झाल्यापासून मिळालेला लाभ पाहता यंदाच अधिक लाभार्थी निवडले जात आहेत. पशुसंवर्धनाच्या जिल्हास्तरीय योजनेसाठीही १४ हजार अर्ज आले आहेत, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.