सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातपिकाचे ६ हजार ५०१ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर पंचनाम्याच्या कामांना गती प्राप्त झाली आहे. दरम्यान, सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर भातलागवड करण्यात आली होती. संपूर्ण भातपीक परिपक्व असतानाच १४ आणि १५ नोव्हेंबरला परतीच्या पावसाचा मोठा तडाखा या पिकांना बसला. सखल भागातील भातपीक दोन दोन दिवस पाण्याखाली राहिले. तर, वादळीवारा आणि मुसळधार पावसामुळे काही भागातील शेती भुईसपाट झाली. या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना सुरूवातीला पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या होत्या.
सुरवातीला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सूचना तितक्याश्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर मंजुलक्ष्मी यांनी कृषी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना युद्धपातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचनाम्यांची गती वाढवली. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ५०१ हेक्टरवरील भातपीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले.
जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांचे १० हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अदांज आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे.
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत साडेसहा हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. - एस. एन. म्हेत्रे, जिल्हा कृषी अधीक्षक
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.