सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याच्या निमित्ताने यावर्षी मुंबई, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यातील दोनशे किलोमीटर परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. आतापर्यंत सुमारे १७ कोटींचा खर्च होऊनही प्रयोगाच्या नावाखाली विमानाच्या अवकाशात नुसत्याच घिरट्या सुरू आहेत. प्रयोग अद्याप सुरूच असल्याने त्यासाठी आणखी वाढीव सात ते आठ कोटींचा वाढीव निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील वर्षीच्या दुष्काळाच्या झळा अद्याप संपलेल्या नसून सोलापुरातील मोहोळ, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यांसह मराठवाडा व विदर्भातील ९० हून अधिक तालुक्यातील बळीराजाला नैसर्गिक असो की कृत्रिम पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने टॅंकरची संख्या अद्याप कमी झाली नसून भूगर्भातील पाणीपातळीही घटलेलीच आहे. आतापर्यंत राज्यात २०१५ आणि २०१८ मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. यंदाही कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याने त्यातून दुष्काळाच्या झळा कमी होतील, अशी आशा बळिराजाला होती. मात्र, कोट्यवधींचा चुराडा करूनही प्रयोगाच्या नावावर कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या विमानांच्या अवकाशात नुसत्याच घिरट्या सुरूच असल्याचे चित्र आहे. हा प्रयोग यशस्वी झाला का, त्यातून किती पाऊस पडला, यशस्वी प्रयोगासाठी ठोस संशोधन काय असावे, यावर कोणीच बोलत नाही. मुंबई, सोलापूर व औरंगाबाद येथे कृत्रिम पावसासाठी रडार यंत्रणा कार्यान्वित करून त्या परिसरात पाऊस पाडण्यासाठी यंदा ३० कोटींची तरतूद केली. त्यापैकी काही रक्कम प्रयोगासाठी खर्च झाली मात्र, पाऊस किती पडला की पडलाच नाही हे सांगता येणार नाही. पावसाळा संपेपर्यंत प्रयोग सुरूच राहणार आहेत. - श्रीरंग घोलप, प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प, मुंबई कृत्रिम पाऊस दृष्टिक्षेपात
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.