जळगाव : गिरणा धरणातून काही दिवसांपूर्वी गिरणा नदीत आवर्तन सोडण्यात आले. यामुळे चाळीसगावसह पाचोरा, भडगाव, जळगाव तालुक्यांतील पाणीटंचाईचा प्रश्न तूर्त मिटण्यास मदत झाली. या धरणातील पाणीसाठा पाहता इतर जिल्ह्यांचे पाणी आरक्षण त्यावर आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला यापुढे दर दोन महिन्यांनी पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे. परिणामी पाणी सोडण्यावरून खासदार, आमदार व गिरणा पाटबंधारे विभाग, जिल्हा प्रशासनातील वाद काही अंशी मिटल्याची चिन्हे आहेत.
एक ऑक्टोबरला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यात खासदार ए. टी. पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, किशोर पाटील, उन्मेष पाटील यांनी गिरणेच्या पाण्यावर अगोदर जळगाव जिल्ह्याचा, त्यानंतर इतर जिल्ह्यांचा हक्क असल्याचे सांगितले. या धरणातून पाणी केवळ जळगावलाच मिळाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यावर गिरणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील अनेक गावे, मालेगावला पाणी द्यावे लागेल, असे सांगितले. यावरून लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त करून अगोदर जळगावला, नंतर इतरांचे ठरवा, असे सुचविले. त्यावर पालकमंत्र्यांनी पाणी आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी वेगळी बैठक घ्यावी, असे सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम धरणांतील पाणी आरक्षण ठरविले होते. गिरणाचे पाणी सोडण्याबाबत मुंबईत बैठक झाली. त्यात अधिकाऱ्यांनी या पाण्यावर इतरांच्या हक्काशिवाय जळगावला दर दोन महिन्यांनीच पाणी देणे शक्य असल्याचे सांगितले. त्यानुसार हे पाणी सोडले जाणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.