खरेदी केंद्रे बंद होताच बाजारातही हरभरा दर खाली

शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली, मात्र शासनाने हरभरा खरेदी न करताच शासकीय खरेदी केंद्र बंद केले. खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. जर खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळाली नाही तर तोच हरभरा कमी दराने बाजारात विकावा लागणार आहे. त्यात केंद्रे बंद होताच हरभऱ्याचे बाजारातील दरही पाडले आहेत. - मिलिंद बागल, शेतकरी नेते
हरभरा
हरभरा

नगर ः राज्यात हमीभावाने हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी सुरू असलेली शासकीय हरभरा खरेदी केंद्रे बंद झाली अन्‌ राज्यभरातील बाजारात हरभऱ्याचे दर २०० ते २५० रुपये क्विंटलने खाली आले. खरेदी केंद्रे बंद होण्याच्या दिवशी नगर बाजार समितीत ३१७५ ते ३३०० रुपये क्विंटल असलेला दर दुसऱ्या दिवशी ३००० ते ३२०० रुपयांवर आला. त्यामुळे सरकारी खरेदी केंद्रे बंद झाल्यावर हरभऱ्याचे दर खाली आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शासकीय हरभरा खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

राज्यातील जवळपास २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये यंदा हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. बाजारात आवक वाढली की लगेच हरभऱ्याचा दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत बाजारात हरभऱ्याची हमी दरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात होती. त्यामुळे हमीभावाने खरेदी करण्यासाठी सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी झाल्याने केंद्रे सुरू झाली होती. बुधवारी (ता. २९) खरेदी केंद्राची मुदत संपल्याने खरेदी केंद्रे बंद झाली आहेत.

सरकारी खरेदी केंद्रे बंद होताच बाजारात हरभऱ्याचे दर २०० ते २५० रुपयांनी खाली आहेत. मुळात सध्या बाजारात १२०० ते १५०० रुपये कमी दराने हरभऱ्याची खरेदी सुरू आहे. महिनाभरापूर्वी बाजारात ३२०० ते ३६०० रुपयांचा दर होता. चार दिवसांपूर्वी खरेदी केंद्रे बंद होताच ३१७५ ते ३३०० रुपये मिळणारा दर ३००० ते ३२०० रुपयांवर आला आहे. दर खाली येण्याचे कारण मात्र सांगितले जात नाही.

खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. खते, बियाणे खरेदी करण्यासह मशागतीची उधारी शेतकऱ्यांना मिटावयची आहे. त्यामुळे हरभरा विकल्याशिवाय पर्याय नाही. सरकारने खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली नाही, तर बाजारात हरभऱ्याची आवक अजून वाढून हरभऱ्याचे दर खाली येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील हरभरा खरेदी केंद्रे बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करूनही हरभरा विक्री करता आली नाही. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्रांना पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. एकट्या नगर जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ३३१ शेतकऱ्यांकडून १ लाख ५४ हजार ३७१ क्विंटल हरभरा खरेदी झालेली आहे. हरभरा विक्रीसाठी २४ हजार ६४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले. अजून सुमारे दहा हजार ३१४ शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com