पीकविमा योजना ही तर पंतप्रधान कॉर्पोरेट कल्याण योजना ः राजू शेट्टी

कांदा निर्यात प्रोत्साहन साह्य अकारण बंद केलेजातेय. कांदा उत्पादक उद्ध्वस्त झाला असताना कांदा निर्यात प्रोत्साहन साह्य बंद करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय हा सरकार शेतकरीविरोधी आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसाआहे. - राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
राजू शेट्टी
राजू शेट्टी

औरंगाबाद  : सरकारने दुष्काळ जाहीर केला, तरीही शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळाला नाही. दुष्काळामुळे खरेतर परतावा देऊन विमा कंपन्या कंगाल व्हायला हव्या होत्या. पण त्या नफ्यात राहिल्या. त्यामुळे ही पंतप्रधान पीकविमा योजना नसून, पंतप्रधान कॉर्पोरेट कल्याण योजना असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर बुधवारी (ता. १२) औरंगाबाद येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शेतकरीहितासाठी आरपारच्या लढाईची घोषणा केली.

श्री. शेट्टी म्हणाले, की २०१६-१७ मध्ये विम्यापोटी शेतकऱ्यांनी १७ हजार ९८२ कोटी विमा कंपन्यांना दिले. त्याचा परतावा करताना शेतकऱ्यांना केवळ ४२०९ कोटीच मिळाले. २०१७-१८ मध्ये २० हजार ७६० कोटी शेतकऱ्यांनी भरले. त्या बदल्यात कंपन्यांनी केवळ ४२९१ कोटींचाच विमा परतावा दिला. या दोन वर्षांत शेतकरी नैसर्गिक आपत्तीने सर्वाधिक संकटात असताना विमा कंपन्यांचा नफा मात्र १९ हजार ४५४ कोटींवर पोचला. सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा हा प्रकार आहे. सरकारमधील लोक सामील असल्याशिवाय हे शक्‍य नाही.

एका बाजूला दुष्काळ जाहीर केला, तर दुसरीकडे उंबरठा उत्पन्न जास्त दाखवून विमा परताव्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले. यामुळे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १२ कोटींपुढे विमा परतावा जाईल, असे वाटत नाही. दुष्काळ जाहीर करून साडेसात महिने उलटले. परंतु दुष्काळावर उपाययोजना करताना सरकार कमी पडले. ३४ हजार कोटींपर्यंत जाहीर झालेला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ १६ ते १७ हजार कोटींवर येऊन थांबला. त्यातही रकमेच्या व्याजाचा प्रश्न निर्माण झाला. कर्जमाफी नाही, कर्ज मिळत नाही, दुष्काळामुळे जवळ पैसा नाही, अशा विचित्र संकटात शेतकरी सापडले आहेत, असे श्री. शेट्टी म्हणाले.

चारा छावण्या सुरू केल्या. परंतु किचकट निकषांमुळे हळूहळू चारा छावण्या बंद पडत आहेत. या संकटसमयी शेतकऱ्यांच्या हक्‍कासाठी पुन्हा एकदा आरपारची लढाई करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. महिनाभराच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याचा परतावा व नियमानुसार अल्प व दीर्घ मुदतीचे कर्जवाटप न झाल्यास विभागीय आयुक्‍तालयाला बेमुदत घेराव आंदोलन करण्याचा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला.

‘...तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू’ दुष्काळामुळे फलोत्पादकांचे झालेले नुकसान पाहता बागा संपलेल्यांसाठी एकरी १ लाख रुपये, ज्या शेतकऱ्यांचे निम्मे नुकसान झाले त्यांना एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी. त्यासाठी आठवडाभरात पंचनाम्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरावर फलोत्पादकांचा मोर्चा काढू, असा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com