
औरंगाबाद : आधी पावसाच्या लहरीपणाने मारले आता अति पाऊस पिकाच्या जिवावर उठला. त्यामुळे अनेक संकटांतून वाचलेल्या खरिपाच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फिरल्याने ऐन दिवाळीत काढणीला, वेचणीला आलेल्या खरीप पिकांचे पावसाने मोठे नुकसान केल्याची स्थिती मराठवाड्यातील बहुतांश भागात पाहायला मिळते आहे. शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची मागणी केली जात असून, विमा संरक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचीही विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तत्काळ पाहणी करावी व पंचनामे करण्याची गरज निर्माण झाली आहे.
यंदाच्या खरिपात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास ४९ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. गतवर्षीच्या खरिपात पेरणी झालेल्या खरिपाचे क्षेत्र ४७ लाख ८८ हजार ६५९ हेक्टर इतके होते. यंदा झालेल्या खरीप पेरणीच्या क्षेत्रात १ लाख ७ हजार हेक्टरवर बाजरी, २ लाख ६९ हजार हेक्टरवर मका, ४ लाख ५६ हजार हेक्टरवर तूर, १ लाख २४ हजार हेक्टरवर मूग, १ लाख १३ हजार हेक्टरवर उडीद, १३ हजार ३०० हेक्टरवर भुईमूग, ४५६४ हेक्टरवर तीळ, १९ लाख ९१ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर जवळपास १२ लाख १० हजार हेक्टरवरील कपाशीचा समावेश आहे. यंदा सुरवातीपासूनच मराठवाड्यात पावसाने आपल्या लहरीपणाचा परिचय दिला. त्यामुळे ना वेळेवर पेरण्या झाल्या ना पिकांना गरजेच्या वेळी पाऊस झाला. त्यात मका पिकावर आलेल्या लष्करी अळीने मकाचे पीक बहुतांशी आधीच उद्ध्वस्त केले.
खाण्यापुरती बाजरी पेरणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजरीची, शिवाय मक्याची व सोयाबीनची सोंगणी सुरू केली अन् पावसाने मराठवाड्यात तळ ठोकला. आठवड्यापासून पावसाचा मुक्कामच हलेनासा झाल्याने शेतांमध्ये सोंगून ठेवलेल्या मक्याची कणसे पाण्याने भिजून त्याला कोंब आले. वेचणीला आलेल्या कपाशीची वाताहत झाली. शिवाय पोसलेली बोंड काळी, तर एकूणच कपाशीची झाडे लाल पडली. बाजरीच्या पट्ट्यात बाजरीचेही मोठे नुकसान पावसाने केले. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणावर मात करून कशीबशी पीक हातातोंडाशी आली असताना ती गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पंचनामेच होत नसल्याने नेमके नुकसानीचे क्षेत्र किती हे कळायलाही मार्ग नाही. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांत सतत कमी अधिक प्रमाणात बरसणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होते आहे. अक्षम्य दुर्लक्ष आधी निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या वाताहतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन व शासनाकडून अजूनही शेतकऱ्यांना धीर देण्यालायक कोणतीच पावले उचलली जात नसल्याची स्थिती आहे. पिकाला विम्याच्या संरक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून कृषी विभाग, महसूल विभाकडे तर त्यांच्याकडून विमा कंपन्यांकडे बोट दाखवून चालढकल केल्या जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कृषी व महसूलचा प्रतिनिधी आल्याशिवाय पंचनामेच करीत नाहीत. प्रशासनातील कुणी सुट्यांमुळे गांभीर्याने घेण्यास व लक्ष द्यायला तयार नसल्याची स्थिती असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. प्रतिक्रिया कपाशीची बोंडं सडली, सरकीला कोंब फुटले. मका पिकाचा चारा सारा कुजून गेला, बाजरी सडली. पावसाला जोर चढलाय, त्यामुळं आमची खरिपाची पिकं संपली. आधी पाऊस नव्हता म्हणून अन् आता पावसानं वाताहत चालविलीयं. विमा कंपन्या दखल घ्यायला तयार नाही, प्रतिनिधी फोन उचलीत नाही, कृषी विभाग त्यांना फोन करायला सांगतं, स्वत: येऊन कृषी विभागाचे कर्मचारी पाहत नाही. काय करावं काही सुचत नाही. कुणीच दखल घ्यायला तयार नाही. - निवृत्ती घुले, वखारी, जि. जालना
पडत असलेल्या तुफान पावसामुळे उरल्या सुरल्या पिकांचे आतोनात नुकसान होऊन दीपोत्सवातच आमची सर्व शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती संवेदना ठेवून शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानापोटी त्यांचा हक्काचा वीमा आणि पीक नुकसानभरपाई द्यावी. आमदार खासदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. - रामेश्वर युवरे, शेतकरी, काळेगाव, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.