परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ज्वारी, गहू पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. या तीन जिल्ह्यांत ज्वारीच्या क्षेत्रात ८२ हजार २२० हेक्टरने आणि गव्हाच्या क्षेत्रात ३२ हजार १७४ हेक्टरने घट झाली आहे. शनिवारपर्यंत (ता. २३) नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ४ लाख ८६ हजार ८९१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र जास्त आहे. परभणीत सर्वसाधारण क्षेत्र सुमारे २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ९ हजार ५११ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र सुमारे १ लाख ३३ हजार ४१५ हेक्टर असताना १ लाख ५३ हजार ४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र सुमारे १ लाख २६ हजार २९० हेक्टर असताना १ लाख २४ हजार ३३४ हेक्टरवर पेरणी झाली. या तीन जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ५ लाख ३७ हजार ७२ हेक्टर असताना, ४ लाख ८६ हजार ८९१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाली आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी पेरणी झाली आहे.या तीन जिल्ह्यांत अन्नधान्य आणि चारापीक म्हणून महत्त्व असलेल्या ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १३ हजार ३१० हेक्टर असताना, प्रत्यक्षात १ लाख ३१ हजार ९० हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७ हजार ३९० हेक्टर असताना ७५ हजार २१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीच्या क्षेत्रात ८२ हजार २२० तर गव्हाच्या क्षेत्रात ३२ हजार १७४ हेक्टरने घट झाली आहे. चारापीक म्हणून परभणी जिल्ह्यात १ हजार २३२ आणि हिंगोली जिल्ह्यात १९१ हेक्टर मक्याची पेरणी झाली आहे.
यंदा रब्बीतील प्रमुख नगदी पीक असलेल्या हरभऱ्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५५ हजार ६७० हेक्टर असताना, १ लाख ५ हजार ६४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात ५३ हजार ६० हेक्टर क्षेत्र असताना ८५ हजार ८२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात ५२ हजार ८१० हेक्टर क्षेत्र आहे; परंतु प्रत्यक्षात ७७ हजार ९४८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तीनही जिल्ह्यांत एकूण २ लाख ६९ हजार ४१८ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून, क्षेत्रात १ लाख ७ हजार ८७८ हेक्टरने वाढ झाली आहे. या तीन जिल्ह्यांत रब्बीत करडई, सूर्यफूल, जवस, तीळ ही पिके घेतली जातात. करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ५८ हजार ६०० हेक्टर असताना यंदा केवळ ४७९५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.