रत्नागिरी : उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्यामुळे कोकणात पारा घसरला आहे. जानेवारीचा पहिला आठवडा गारठलेला गेला. रत्नागिरीत किमान तापमान १८ अंशांपर्यंत, तर दापोलीत १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. बागांमध्ये मोहर वेगाने येण्यास सुरुवात झाल्याने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.
क्यार वादळानंतर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बदलले. दिवाळी सरून गेली तरीही थंडीचा पत्ता नव्हता. ऑक्टोबर महिन्यापर्यंत अवकाळी पावसाचा जोर होता. त्यानंतरही किमान तापमान खाली आले नव्हते. परिणामी, आंबा बागायतदारांमध्ये चलबिचल सुरू झाली. ऑक्टोबर हीटच्या प्रभावातून बाहेर पडल्यानंतर हळूहळू गुलाबी थंडीला सुरुवात होते. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात थंडी पडू लागली, तरी कोकणात मात्र थंडी नव्हती. मात्र, गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी गारठा जाणवू लागला आहे.
किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत १२ ते १३.५ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला आहे. कमाल तापमान यंदा २६ आहे. पुढील दोन दिवसांत रत्नागिरीत १५ अंशांपर्यंत पारा खाली घसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
एप्रिलमध्ये होणार आवक
थंडीअभावी पालवीला मोहर फुटण्याची क्रिया वेगाने होत नव्हती. जानेवारीला मोहर आला तर मार्चअखेरपर्यंत आंबा तयार होईल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंब्याची आवक सुरू होईल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तुडतुडा आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यावर फवारणीचा एक हात अधिक मारावा लागला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.