औरंगाबाद : ‘‘पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी नियोजन करत असताना सुधारित वाणांचा वापर, तसेच रासायनिक खतांच्या शिफारशीनुसार योग्य पद्धतीने पीक संरक्षण करणे आवश्यक आहे’’, असे मत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार यांनी व्यक्त केले.
डॉ. पवार म्हणाले, ‘मॉन्सूनचा पेरणीयोग्य (१०० मिलिमीटर) पाऊस होताच वाफसा आल्यानंतर पेरणीस वेग येईल. या वर्षी कपाशी, तूर, मूग, मका, सोयाबीन, उडिद, बाजरी आदी महत्त्वाच्या खरीप पिकांचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. कपाशीसह कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. माहितीअभावी मिळेल ते खत आपल्या सोयीच्या पद्धतीने व सोयीच्या मात्रेत शेतकरी देतात. त्यामुळे अनावश्यक खते वापरली जातात. जास्त मात्रेमुळे आर्थिक नुकसान होते.’’
‘‘वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्च वाढतो आहे. रासायनिक खताचा वापर शास्त्रीय पद्धतीने योग्य प्रकारे करता यावा, यासाठी खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीच्या आधारे बाजारातील प्रमुख उपलब्ध खतांचे एकरी वापराचे प्रमाण निश्चित केले आहे. ही मात्रा शिफारशीप्रमाणे पिकासाठी पेरणी सोबत घ्यावयाची आहे. माती परीक्षणाच्या आधारावर खते दिल्यास खतमात्रेची बचत होते. शेणखताचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर शिफारसीनुसार करणे आवश्यक आहे, अशा सल्ला पवार यांनी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.