परभणी ः परभणी जिल्ह्यातील २०१७-१८ च्या खरीप हंगामातील सोयाबीनची सरासरी उत्पादकता प्रतिएकरी ३ क्विंटल ४२ किलो (हेक्टरी ८ क्विंटल ५५ किलो) मिळाली आहे.
गंगाखेड तालुक्यात सोयाबीनची उत्पादकता सर्वात कमी म्हणजे एकरी १ क्विंटल ८९ किलो (हेक्टरी ४ क्विंटल ७३ किलो) आली आहे. परभणी तालुक्यात सर्वाधिक एकरी ५ क्विंटल ३१ किलो (हेक्टरी १३ क्विंटल २८ किलो) आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादकतेत एकरी ९२ किलोची (हेक्टरी २ क्विंटल २९ किलो) घट झाली आहे.
सोयाबीनची उत्पादकता काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे. कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातर्फे यंदा सोयाबीनचे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी परभणी तालुक्यात २४ आणि इतर आठ तालुक्यात प्रत्येकी १२ याप्रमाणे एकूण १२० पीक कापणी प्रयोग घेण्यात आले.
या प्रयोगाचे निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर त्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यावरून जिल्ह्यात सोयाबीनची सरासरी उत्पादकता एकरी ३ क्विंटल ४२ किलो (हेक्टरी ८ क्विंटल ५५ किलो) आली आहे.
परभणी तालुक्यात सर्वाधिक सरासरी एकरी उत्पादकता ५ क्विंटल ३१ किलो (हेक्टरी १३ क्विंटल २८ किलो) मिळाली आहे. तर गंगाखेड तालुक्यात सरासरी उत्पादकता एकरी १ क्विंटल ८९ किलो (हेक्टरी ४ क्विंटल ७३ किलो) आली आहे. यंदा जिल्ह्यात २ लाख २२ हजार ७४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती.
२०१६ च्या तुलनेत सोयाबीन लागवडी खालील क्षेत्रात यंदा १५ हजार १४७ हेक्टरची घट झाली होती. सोयाबीनच्या पेरणीनंतर जिल्ह्यात तब्बल ४० ते ५५ दिवसाचा प्रदीर्घ पावसाचा खंड आला होता. त्यानंतर किडीसाठी पोषक वातावरणामुळे खोड माशी मोठ्या प्रमाणावर प्रार्दुभाव झाला. काढणीच्या अवस्थेत आलेल्या पावसामुळे दाण्याची प्रत खराब झाली.
विशेषतः जुलै महिन्यात उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनच्या उत्पादकतेत मोठी घट झाली आहे. शेंगा न भरल्यामुळे हजारो हेक्टर जमिनीवरील सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांनी मोडून टाकले. अनेक भागातील शेतकऱ्यांना काढणीच्या खर्चाएवढेदेखील उत्पादन झाले नाही. यंदा परभणी जिल्ह्याची सोयाबीनची सरासरी उत्पादकता एकरी ३ क्विंटल ४२ किलो तर (हेक्टरी ८ क्विंटल ५५ किलो) मिळाली आहे.
परभणी तालुक्यात सोयाबीनची सरासरी एकरी उत्पादकता ५ क्विंटल ३१ किलो (हेक्टरी १३ क्विंटल २८ किलो), जिंतूर तालुक्यात ४ क्विंटल ४४ किलो (हेक्टरी ११ क्विंटल ११ किलो), सेलू तालुक्यात एकरी २ क्विंटल ८२ किलो (हेक्टरी ७ क्विंटल ७ किलो), मानवत तालुक्यात एकरी ३ क्विंटल ३७ किलो (हेक्टरी ८ क्विंटल ४३ किलो), पाथरी तालुक्यात २ क्विंटल ९० किलो (हेक्टरी ७ क्विंटल २७ किलो), सोनपेठ तालुक्यात एकरी २ क्विंटल २५ किलो( हेक्टरी ५ क्विंटल ६४ किलो), गंगाखेड तालुक्यात एकरी १ क्विंटल ८९ किलो (हेक्टरी ४ क्विंटल ७३ किलो), पालम तालुक्यात एकरी १ क्विंटल ९३ किलो (हेक्टरी ४ क्विंटल ८४ किलो), पूर्णा तालुक्यात एकरी ३ क्विंटल ९५ किलो ( हेक्टरी ९ क्विंटल ८८ किलो) एवढी मिळाली आहे.
उत्पादकतेवर मोठा परिणाम
२०१४-१५ मध्ये कमी पाऊस झाल्यामुळे उत्पादकतेत मोठी घट झाली होती. सोयाबीनची सरासरी उत्पादकता हेक्टरी ३ क्विंटल २५ किलो तर २०१५-१६ मध्ये देखील अवर्षणामुळे हेक्टरी २ क्विंटल २२ किलो एवढी उत्पादकता होती. २०१६ मध्ये मात्र चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीनची सरासरी उत्पादकता हेक्टरी १० क्विंटल ८४ किलो एवढी आली होती.