निफाड, जि. नाशिक : तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कृषी विभागाच्या रोपवाटिकेतून नैताळे येथील शेतकरी भागवत बोरगुडे यांनी भगवा जातीच्या डाळिंबाचे रोप खरेदी केले होते; मात्र हे रोप बोगस निघाल्याने त्यांचे नुकसान झाले. त्यांनी नाशिक येथील ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. त्यांच्या बाजूने निकाल लागूनही त्यांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अखेर त्यांनी आपली बाग जेसीबी मशिनने काढून टाकली आहे.
कृषी विभागाच्या पिंपळगाव बसवंत येथील रोपवाटिकेतून २०१२ मध्ये डाळिंब लागवडीसाठी जवळपास १४० शेतकऱ्यांनी रोपे खरेदी केली होती. खरेदी केलेल्या वाणामध्ये भगवाऐवजी इतर जंगली जातींचा समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. नैताळे येथील भागवत बोरगुडे यांनी शासनावर संताप व्यक्त करत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती.
या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व बोगस रोपामुळे उत्पादनात लाखो रुपयांचा तोटा झाल्याने भरपाई मिळावी, या मागणीसाठी त्यांनी ग्राहक तक्रार निवारणाकडे धाव घेतली. न्याय मंचाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. दोषी अधिकाऱ्यांनी तक्रारदार शेतकऱ्याला तीन लाख रुपये भरपाई द्यावी, तसेच १० डिसेंबर २०१४ पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत दसादशे१० टक्के प्रमाणे व्याज अदा करावे, तसेच तक्रारदाराच्या मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये, तर अर्ज व इतर खर्चापोटी पाच हजार रुपये द्यावेत, असा निकाल दिला होता;
मात्र हा निकाल कृषी विभागाने झुगारून दिला आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांनी न्यायालयात अपील केले आहे. दरम्यान, या सर्व शासकीय गोंधळनाने संतापलेल्या बोरगुडे यांनी जेसीबी मशिनने डाळिंब बाग काढून टाकली आहे.