कोल्हापूर : जिल्ह्यात अद्यापही ई-पॉस मशिनची उपलब्धता न झाल्याने ज्या विक्रेत्यांना हे मशिन मिळाले नाहीत; त्यांना खताची विक्री करणे अडचणीचे झाले आहे. या मशिनशिवाय खतविक्री करू नये, असा अादेश शासनाने काढल्याने विक्री कशी करायची, या चिंतेत खत उत्पादक आहेत.
पहिल्या टप्प्यात म्हणजे चार महिन्यांपूर्वी एकूण विक्रेत्यांच्या फक्त पन्नास टक्के पॉस मशिनची उपलब्धता विक्रेत्यांना झाली. सुरवातीच्या टप्प्यात ही यंत्रणा कशी हाताळायची, याची माहिती नसल्याने काही काळ मशिन तशीच पडून राहिली.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दोन महिन्यांपूर्वी हे मशिन कसे वापरायचे याबाबत प्रशिक्षण दिले खरे़, पण केवळ प्रशिक्षणच झाले. ज्यांच्याकडे मशिन आहे ते विक्रेत्यांनी थोड्या प्रमाणात खताची विक्री सुरू केली, पण ज्याच्याकडे मशिन नाही अशांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक खत उत्पादक कंपन्यांनी मशिन नसल्याने उत्पादकांना खताचा पुरवठा केला नाही. यामुळे या विक्रेत्यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे. शासनाकडे या मशिनच्या उपलब्धतेबाबत विचारताच कधी येइल; त्या वेळी देतो अशी माहिती कृषी विभागाकडून दिली जाते. ती नेमकी कधी मिळतील याचीही शाश्वती नाही.
ऐन रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवरच तांत्रिक अडचणींमुळे अनेक दुकानदारांनी खतविक्री थांबविली आहे. यामुळे ज्या विक्रेत्यांकडे हे मशिन आहे त्याच्याकडे जाऊन अतिरिक्त वाहतूक खर्च करीत शेतकरी खते आणत आहेत. रब्बी हंगामासाठी १ लाख ८० हजार मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. पहिल्या टप्प्यात ७४७ मशिन देण्यात आली. ८९० विक्रेते मशिनविना खोळंबले आहेत. खत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल, तर मशिन नसल्याने विक्रेते त्रस्त अशी परिस्थिती आहे.