लातूर कृषी विभागातील बदल्या प्रकरणाची चौकशी

लातूर कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आल्याप्रकरणी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
लातूर कृषी विभागातील बदल्या प्रकरणाची चौकशी
लातूर कृषी विभागातील बदल्या प्रकरणाची चौकशी

लातूर : लातूर कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आल्याप्रकरणी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.  दैनिक ‘ॲग्रोवन’ने सोमवारच्या (ता. १७) अंकात ‘उशिराच्या बदल्या संशयाच्या भोवऱ्यांत’ असे वृत्त प्रकाशित करून प्रकाश टाकला होता. याची दखल कृषी सचिव श्री. डवले यांनी घेतली आहे. या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांना देण्यात आल्याची माहिती श्री. डवले यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली. लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्यातील तीनशेपेक्षा अधिक बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे हे प्रकरण आहे. सेवा ज्येष्ठता यादी, रिक्त जागांची प्रसिद्धी न देताच, समुपदेशन न घेताच बदल्या करण्यात आल्या आहेत.  मर्जीतल्यांना चांगली ठिकाणे देण्यात आली आहेत. त्यात शासनाच्या आदेशानुसार १० ऑगस्टपर्यंत बदल्या होणे अपेक्षित होते. शासनाने ३१ जुलैनंतर ही वाढीव मुदत दिली होती. तरी देखील या मुदतीत बदल्यांचे आदेश कृषी सहसंचालक कार्यालयातून बाहेरच पडले नाहीत. माया जमवण्यासाठी बदल्याचे आदेश देण्यास विलंब होत असल्याची चर्चेने जोर धरल्यानंतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. रविवारी सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन बदलीचे आदेश देण्याचा प्रकार करण्यात आला. यात सोमवारी (ता. १७) या पाच जिल्ह्यातील अनेक बदली पात्र कर्मचाऱ्यांना हे बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये करण्यात आलेल्या अनियमिततेची जोरदार चर्चा सध्या विभागात आहे. दरम्यान ‘ॲग्रोवन’च्या वृत्ताची दखल राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी घेतली आहे. लातूर कृषी विभागातील या बदल्यांच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांना देण्यात आल्याची माहिती श्री. डवले यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.

कृषी राज्यमंत्र्यांचे आदेशही धुडकावले कृषी विभागातील कार्यकाल पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत अधिनियमातील अनुच्छेद क्रमांक चार (एक) मध्ये तरतूद आहे. या नुसार बदल्यांचा प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांनी एकाच आदेशात करण्यात यावा. तथापि उपरोक्त प्रस्तावामध्ये कलम ४ (४) नुसार कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली होत असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी सदरच्या प्रस्तावास शासनाची मान्यता घ्यावी, असे पत्र कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी ८ जुलै रोजी कृषी सचिवांना लिहिले आहे. त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाचे प्रशासन अधिकारी ज्ञानचंद्र गिते यांनी १६ जुलै रोजी राज्यातील सर्व विभागीय सहसंचालकांना आदेशही दिले. एकूणच एकाच आदेशात सर्वांच्या बदल्या होणे अपेक्षित होते. पण लातूर कृषी विभागाने मात्र सर्व कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे वेगवेगळे आदेश काढून मंत्र्यांचे आदेशही धुडकावल्याची माहिती समोर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com