कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष शिंदे यांचा चाळीत साठविलेला शंभर क्विंटल कांदा चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
सुभाष शिंदे यांनी आपल्या शेतातील चाळीत सुमारे १५० क्विंटल कांदा पाच महिन्यांपासून साठवून ठेवला होता. गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कांदा काढण्यास सुरवात केली. मागील आठवड्यात १५ क्विंटल कांदा त्यांनी विकला. चाळीत १३५ क्विंटल कांदा होता. मात्र चोरट्यांनी त्यातून शंभर क्विंटल कांदा मोठ्या गाडीत भरून लंपास केला. ही घटना बाजूचे शेतकरी प्रफुल्ल शिंदे सकाळी शेतात आल्यावर त्यांना समजली. मोठ्या गाडीचे टायर गाऱ्यात उमटलेले व चाळीत कांदा विखुरल्यासारखे दिसले. त्यांनी सुभाष शिंदे व हर्षल शिंदे यांना भ्रमणध्वनीने कळविले.
परिसरात अनेक शेतकऱ्यांचे बियाणे खराब असल्याने कांदा खराब झाला. मात्र मी चार हजार रुपयांच्या उच्च प्रतीच्या बियाण्यापासून रोपे तयार करून कांदालागवड केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून कांदा चाळीत जशाच तसा टिकून होता. काही दिवसांपूर्वी भाव कमी होते, मात्र आता भाव वाढत असल्याने टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी काढत होतो. अशातच चोरट्यांनी शंभर क्विंटल कांद्यावर हात साफ केला. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास नेला आहे. - सुभाष शिंदे, शेतकरी, कुसुंबा (जि.धुळे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.