पावसासाठी वेधशाळा, अभ्यासकांकडे सर्वांचे लक्ष

पावसाने अनपेक्षितपणे दगा दिल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहे. काहींनी पेरणी केली, तर काहींची बाकी असल्याने रात्रंदिवस आकाशाकडे नजरा खिळल्या आहे. सोबतच वेधशाळा, हवामान खाते आणि विविध हवामान तज्ज्ञांचे अंदाजही शेतकरी रोज पडताळत आहे.
Observatory for rain, everyone's attention to the practitioners
Observatory for rain, everyone's attention to the practitioners

येवला, जि. नाशिक : पावसाने अनपेक्षितपणे दगा दिल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहे. काहींनी पेरणी केली, तर काहींची बाकी असल्याने रात्रंदिवस आकाशाकडे नजरा खिळल्या आहे. सोबतच वेधशाळा, हवामान खाते आणि विविध हवामान तज्ज्ञांचे अंदाजही शेतकरी रोज पडताळत आहे. याशिवाय नक्षत्र आणि त्याचे वाहन यावर देखील पावसाचे गणित जुळत असल्याने पंचांग शास्त्रानुसार नक्षत्रांचे अंदाजदेखील घेतले जात आहे.

आजकाल पाऊस बेभरवशाचा झाला असून, अगदी चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या या पावसाच्या मागेपुढे शेतकरीच नव्हे, तर सर्वच जण घुटमळतात. याचा माग घेताना हवामान खात्याच्या अंदाजाकडे नजरा लागून असतात. आज विज्ञान युगात पर्जन्य नक्षत्र आणि वाहन यावरून पावसाचा अंदाज बांधण्याला तितकेच महत्त्व असून, ग्रामीण भागात हवामान खात्यासह नक्षत्रावरच भरवसा असून, यावरच पावसाचे गणित जुळवले जात आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे भाकीत केले आहे. मात्र पहिल्या महिन्याभरात हे भाकीत खोटे ठरल्याने आता वेगवेगळे हवामान तज्ज्ञ, नक्षत्र व पंचांग शास्त्राचा देखील शेतकरी अभ्यास करून पावसाचा अंदाज घेत आहेत.

प्राचीन काळापासून पावसाचा अंदाज नक्षत्रांनुसार जुळवला जातो. बदलत्या जमान्यात वेधशाळा आधुनिक वैज्ञानिक नियमांवर आधारित पावसाचा अंदाज वर्तवू लागल्या आहेत. पण नक्षत्रांना हा पर्याय होऊ शकलेला नाही. आजही शेतकरी पंचांग व त्यातील नक्षत्रावर विश्‍वास ठेवून आहेत. पर्जन्य नक्षत्र आणि त्यांची वाहन यावरून वर्तवलेल्या अंदाजाला वैज्ञानिक शास्त्रीय कारणे नसून, हे केवळ ठोकताळे असतात हे माहीत असूनही त्यावरील विश्‍वास तसूभरही घटलेला नाही, हे नक्की...! ज्योतिषशास्त्र आणि पर्जन्यपूरक आहेत. महाराष्ट्रातील सोलापूरचे विश्‍वसनीय दाते पंचांग, रुईकर पंचांग, पारनेरकर पंचांग, राजंदेकर पंचांग, टिळक पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर अशा सर्वांनीच पर्जन्याचा विचार मांडलेला आहे.

ही आहेत नक्षत्रे... पंचांगानुसार २७ नक्षत्र असून, यात पावसाची ९ नक्षत्रे आहेत. त्यातील मृग हे पहिले नक्षत्र मानले जाते. कृत्तिका व रोहिणी ही नक्षत्रे पूर्वमोसमी मानली आहेत. विविध रूपांत ही नक्षत्रे येतात. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्‍लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त या नऊ नक्षत्रांना पावसाचे कोंदण लाभले आहे.

नक्षत्र, पावसावरच्या म्हणी जुन्या लोकांनी नक्षत्राच्या अनुभवावर पडणाऱ्या पावसाचा अंदाजाने काही म्हणीही रूढ केल्या आहेत. आजही या म्हणींचा ग्रामीण भागात बोलीभाषेत सर्रास वापर होतो. अशा काही म्हणी -

  • मघा लागल्या तर जगा, नाही तर ढगाकडे बघा!
  • मृगाची पडली झड...गुराख्याच्या पोराची मोडली खोड
  • लागल्या उत्तरा...भात खाईल कुत्रा
  • नाही लागल्या मघा...ढगाकडे बघा
  • लागला हत्ती तर...पाडील भिंती
  • पडल्या स्वाती तर पिकतील मोती
  • पावसाबाबत वेधशाळा अन् पंचागाचे अंदाज आजही जुळतात. ज्योतिष आणि विज्ञान एकमेकांना पूरक आहेत. यामुळे ग्रामीण भागात नक्षत्र व पंचांग विचाराला महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्र जाणून घेतल्यास नक्कीच पर्जन्य विचार अधिक स्पष्टपणे शेतकरी बांधवांना सांगता येईल. -पं. डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी, पचांग अभ्यासक, येवला

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com