बियाणे लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्राला नोटीस 

जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात बियाणे विक्रीत गोंधळ सुरू असल्याच्या बाबी समोर येत आहेत. सोयाबीन बियाण्यासोबत इतर बियाणे घेण्याची जबरदस्ती करण्याचे प्रकरण मंगळवारी (ता. ८) कृषी विभागाने केलेल्या कारवाईने समोर आणले.
soybean
soybean

अकोला ः जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात बियाणे विक्रीत गोंधळ सुरू असल्याच्या बाबी समोर येत आहेत. सोयाबीन बियाण्यासोबत इतर बियाणे घेण्याची जबरदस्ती करण्याचे प्रकरण मंगळवारी (ता. ८) कृषी विभागाने केलेल्या कारवाईने समोर आणले. या विक्रेत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, सोमवारी (ता. १४) त्याच्यावर अकोला येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

तेल्हारा येथील दधीमथी कृषी सेवा केंद्र संचालकाने ‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे हवे असेल तर कपाशीचे बियाणे घ्यावेच लागेल, असा आग्रह केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन बियाणे हवे असतानाही ते न देता लिंकिंग करण्याचा प्रकार येथे केला जात होता. मंगळवारी रूपेश लासूरकर नावाच्या शेतकऱ्याने रीतसर तक्रार केल्यानंतर कृषी विभागाची यंत्रणा कारवाईसाठी पुढे आली. अधिकाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा सोयाबीन बियाण्यासह कपाशीचे बियाणे विक्री केल्याच्या पावत्या दिसून आल्या. चौकशी केल्यानंतर याबाबत तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी सविस्तर अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवला. या प्रकरणी जिल्हा कृषी विभागाने तातडीने या केंद्र चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून सोमवारी सुनावणीस बोलावले आहे.  कापूस बियाणे विक्रीतही नियम मोडले  प्री-मॉन्सून कपाशी लागवडीला पायबंद घालण्यासाठी ३१ मेपूर्वी बियाणे विक्री करू नये, असे स्पष्ट आदेश कृषी आयुक्तालयाने दिलेले आहेत. असे असतानाही तेल्हारा येथील कृषी केंद्रचालकांनी कपाशीचे बियाणे ३१ मेपूर्वी विक्री केले. ही बाब कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीत आठवडाभरापूर्वीच समोर आलेली आहे. या प्रकरणात संबंधित विक्रेत्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. परंतु ही वेळ उलटून गेली तरी खुलासा मिळाला नसल्याचे समजते. आता लिंकिंग व कापूस बियाणे विक्री प्रकरणात एकत्रच १४ जून रोजी सुनावणी होणार असून, कारवाईची दिशा स्पष्ट होईल. 

कर्मचाऱ्यांची नेमणूक कागदोपत्रीच  या हंगामात बियाणे, खत विक्री सुरळीत व्हावी यासाठी प्रत्येक कृषी केंद्रावर कृषी विभागाचा कर्मचारी नेमल्याचा दावा कृषी विभागाचे अधिकारी करीत आहेत. मात्र जिल्ह्यात जितके कृषी सेवा केंद्र आहेत, तेवढे कर्मचारीही या विभागाकडे नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कृषी केंद्रावर नेमणुका कागदोपत्रीच झालेल्या असून, अनेक कर्मचारी आजपर्यंतही कृषी केंद्रांकडे फिरकलेले नाहीत. कर्मचाऱ्यांकडे आधीच हंगामातील कामांच्या विविध जबाबदाऱ्या आहेत. त्यात हे नवीन काम देण्यात आले होते. परिणामी, बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात कृषी विभाग अपयशी ठरला आहे. गेल्या आठवड्यात बाळापूर तालुक्यात वाडेगावमध्‍येही बियाणे विक्रीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. जिल्हाभर अशा तक्रारी समोर येत आहेत. परंतु ठोस कारवाई होत नसल्याने काही विक्रेते याचा फायदा उठवू लागले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com