जगण्यासाठी जत तालुक्यातून स्थलांतर

पाऊस नाही, पाणी नाही त्यामुळे कृषी निविष्ठा खरेदी केंद्रातील खते, औषधे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. नफा नाही, नवीन खतांची खरेदी केलेली नाही. सुमारे ५० टक्के व्यवसाय कमी झाला. - सोमलिंग पुजारी, कृषी निविष्ठा विक्रेते, सोन्याळ, ता. जत जित्राबाला पाणी नाय. चारा नाय. कस जगवायच. दुष्काळ जाहीर केलाय, पण सरकारनं तांबडा पैका दिला नाय. - धोंडो अण्णपा मल्लाड,दरीबडची, ता. जत, जि. सांगली. पाच जित्राबं हाईत. सात एकरांतील खुरटी ज्वारीची ताटं चारा म्हणून वीस हजाराला इकत घेतलाय. कुणीबी एकमेकाला चारा देत न्हाय. - जयश्री कुमार निलजगी, अमृतवाडी, ता. जत, जि. सांगली. भीषण दुष्काळ पडला आहे. माझ्या जन्मापासून म्हैसाळ योजनेचे पाणी येईल असं ऐकत आलोय. आज ३० वर्षं झाली पण पाणी काही आलं नाही. - संजय सातपुते, उमदी, ता. जत, जि. सांगली.
जगण्यासाठी जत तालुक्यातून स्थलांतर
जगण्यासाठी जत तालुक्यातून स्थलांतर

सांगली : ‘‘कधी काळी मृगजळ म्हणायचे, आता मात्र आम्ही जवळून पाहतूया. गारठ्याच्या दिसात भलामोठा जोधळ्यांनी भरलेला असायचा, आता मात्र उन्हाळ्याच्या आधीच रखरखलाय. शेतात जनावरं चारायला, नेली तर त्यांना बी दूरवर मृगजळ दिसतय. पाण्याच्या आशेनं तिकडं धावत्यात, जवळ गेल्यावर कळतय, काहीच नाही. पाऊणशे वर्षांत कधी घेतला नाही, असा अनुभनव घेतूया. वयाची ८० वर्षे ओलांडलेले बादशहा बिरुळ यंदाच्या दुष्काळाची दाहकता सांगत होते. दावणी रित्या होऊ नयेत म्हणून जित्राबं पोसावं वाटतंय, पण आता तेवढी ताकद राहिली नाही. सरकार काही करत नाही, अन जनावरं विकून चारा घ्यायचा, असं मन तयार होत नाही. अशी हतबलताही बादशहा यांनी व्यक्त केली.

जत तालुक्यातील सगळी शिवारं पिकाविना मोकळी आहेत. शेतात जळलेल्या पिकांचे अवशेष दिसत होते. ते खाण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांचे कळप फिरत होते. शेतात काहीच पिकलं नाही. घरातील धान्य संपत आले आहे. तसचे प्रपंच चालविण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांची विक्री करून हातभार लावत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हाताला काम काहीच मिळत नाही. रोजगार हमीची कामे सुरू केली असं सांगितलं, पण कुठेच कामे सुरू नसल्याचे दिसते. त्यामुळे हाताला काम आणि प्रपंचासाठी लागणारा पैसा कमविण्यासाठी गाव सोडून जाण्याचा विचार इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केला. 

उलाढाल ठप्प दुष्काळामुळे प्रपंचाला लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यावर मर्यादा आल्या आहेत. शेतात काहीच पिकले नसल्याने खरेदीसाठी पैसेच शिल्लक नाहीत. उधारी वाढत आहे. आठवडा बाजारातही धान्य, भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. असे दुकानाचे मालक अप्पासाहेब चिकाटे यांनी सांगितले.

जगण्यासाठी स्थलांतर जत तालुक्यात दरवर्षी दुष्काळ वाढू लागला आहे. हाताला काम नसल्याने इथला शेतकरी आपले बिऱ्हाड घेऊन पैसे कमविण्यासाठी ऊसतोडणीसाठी जाऊ लागला आहे. तालुक्यातून दरवर्षी सुमारे ८ ते १० हजार नागरिक ऊस तोडणीसाठी गावे सोडत आहेत. दुष्काळाची दाहकता अशीच राहिली तर हे शेतकरी, मजूर  पुन्हा परत येण्याची शक्यता नाही.

जित्राबं विकायची अन् चारा घ्यायचा तालुक्यात प्रत्येकाच्या दावणीला जित्राबं आहेत. त्यामुळे आर्थिक प्रपंचाला हातभार लागतोय. पण यंदा रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे चारा मिळेणासा झाला आहे. चारा विकत घ्यायचं म्हंटल तर पुरेसा पैसा हाती नाही. यामुळे दावणीला बांधलेली दोन-तीन जित्राबं विकायची आणि वाकळेला चारा विकत घ्यायचा. २५०० ते ३००० रुपये शेकड्याने घेतलेला चारादेखील कमी पडतोय. तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com