गडचिरोली : जिल्ह्यात कर्जमाफी अर्जांच्या चावडी वाचनादरम्यान १८३ अर्जांवर आक्षेप घेण्यात आले. यानंतर आता तालुकास्तरावर आक्षेप नोंदविता येणार आहेत. दरम्यान काही शेतकऱ्यांच्या नावाचा यादीत समावेश नसल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सक्तीची करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाभरात ६५ हजार ६४९ शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले.
शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे जाहीर केल्यानंतरही काही शासकीय कर्मचाऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. चावडी वाचनादरम्यान गावातील नागरिकांनी संबंधीतांच्या अर्जावर आक्षेप घेतले.
२९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत गावपातळीवर चावडी वाचन घेण्यात आले. यामध्ये १८३ अर्जांवर नागरिकांनी आक्षेप घेऊन सदर अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी मात्र अर्ज केल्यानंतरही त्यांचे नाव यादीत नसल्याचा खुलासा झाला. अशा शेतकऱ्यांना तहसीलदारांकडे केलेल्या अर्जाची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारने पुन्हा नवीन सॉफ्टवेअर तयार करून त्यामध्ये शेतकऱ्यांची तीन गटात विभागणी केली आहे. यातील हिरव्या रंगाची यादी पात्र लाभार्थ्यांची राहील. पिवळ्या रंगाच्या यादीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांचा समावेश राहील. लाल रंगाच्या यादीत कायमस्वरुपी रद्द केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा समावेश असेल. जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये चावडी वाचन झाले नाही.