नाशिक : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत साधारण २५ टक्के भूसंपादन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. २६) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी भूसंपादन टक्केवारी वाढविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाची यंत्रणा सक्रिय झाली आहे .
नागपूर, वर्धा, वाशीम, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत गेल्या चार महिन्यांत सरासरी ५० टक्क्यांपर्यंत भूसंपादन झाले असताना, नाशिक जिल्ह्यात मात्र जेमतेम २५ टक्क्यांपर्यंत हे काम झाले आहे. इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतून १०२ किलोमीटचा समृद्धी महामार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी १२८० हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे, पण आतापर्यंत २५ टक्क्यांपेक्षा अधिक जमीन संपादित करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
पावसाळ्यात इगतपुरीत रोजच मुसळधार पाऊस होत असल्याने सुमारे दीड महिना प्रशासनाला काम करता आले नाही. त्यानंतर लागलीच समृद्धी विरोधकांच्या आंदोलनाने वातावरण गरम होते. या सर्वांचा परिणाम समृद्धीच्या भूसंपादनावर झाला.
विदर्भ, मराठवाड्याच्या दुष्काळी भागातील जमीन संपादन जोरात सुरू आहे. ठाण्यातही जमीन अधिग्रहणाची टक्केवारी ३५ पर्यंत पोचली आहे. मुसळधार पावसाने अडचणी वाढल्या असताना इगतपुरी तालुक्यातील आदिवासी गावांमधील ‘पेसा’चा प्रश्न उद्भवला.
सिन्नरच्या सधन गावांतून प्रकल्पाला असलेला विरोध पूर्ण शमलेला नाही. न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. या सर्वांचा प्रकल्पाच्या भूसंपादनावर परिणाम झाला आहे. जमीन घेण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे. आतापर्यंत ३२५ हेक्टर जमीन अधिग्रहणाचे काम झाले आहे. सिन्नरमधील २२५, तर इगतपुरीतील १०० हेक्टरचा समावेश आहे.