परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये ५ लाख २१ हजार ८१० हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
विविध पिकांच्या ९८ हजार ५० क्विंटल बियाणांची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे केली आहे. खरिपासाठी विविध ग्रेडच्या ८९,३६० टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयबीन, मूग, उडीद, तुरीच्या क्षेत्रात वाढ तर कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख २१ हजार ८१० हेक्टर आहे. गतवर्षी ५ लाख २१ हजार ७८२ हेक्टर वर पेरणी झाली होती. यंदा सर्वसाधारण क्षेत्राएवढीच पेरणी होईल असे गृहित धरण्यात आले आहे. गुलाबी बोंड अळीमुळे मोठे नुकसान झाल्याने यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात घट होईल तर सोयाबीन, मूग, उडिद, तूर, ज्वारी, बाजरी, मका, तीळ या पिकांखालील क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात विविध पिकांच्या ४३ हजार २१ क्विंटल बियाणांची विक्री झाली होती. प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी यंदा महाबीजकडे २७ हजार ७७८ आणि खासगी कंपन्यांकडे ७० हजार २७२ अशी एकूण ९८ हजार ५० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
यामध्ये सोयाबीनचे ८६ हजार २५० कपाशीचे ४ हजार ८४, तुरीचे १८७५, मुगाचे १४२५, उडदाचे ४५६, मक्याचे २२५ क्विंटल बियाणांचा समावेश आहे. कपाशीचे प्रतिहेक्टर ५.५ पाकिट यानुसार यंदा प्रस्तावित १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी ९ लाख ७ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीनचे महाबीजकडे २३ हजार, राष्ट्रीय बीज निगम आणि कृषक भारतीकडे प्रत्येकी १००० अशी एकूण २५ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे.
खरीप हंगामासाठी विविध ग्रेडचा ८९३६० टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया ३३,४९०, डीएपी १५,०६०, पोटॅश ३६६०, एनपीके २९७५०, सिंगल सुपर फाॅस्फेट ७४०० टन या खतांचा समावेश आहे. गतवर्षीचा ३५ हजार टन खतसाठा शिल्लक आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.