नाशिक : नाशिक जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून खरीप हंगामात मक्याचे क्षेत्र वाढत आहे. चांगले पाऊसमान, तुलनेने स्थिर बाजारभाव यामुळे या पिकाकडे कल वाढला असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामातही या पिकाखालील क्षेत्र वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. या स्थितीत जिल्ह्यातील कापसाचे क्षेत्र १० टक्के तरी कमी होईल. हे क्षेत्र मका, सोयाबीन या सारख्या पिकांकडे वळेल, असा अंदाज कृषी विभागाला वाटत आहे.
नाशिक जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५२ हजार ५५८ हेक्टर आहे. मागील दोन वर्षांत सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरा झाला आहे. २०१६-१७ च्या हंगामात प्रत्यक्षात ६ लाख ६२ हजार १९३ हेक्टरवर पेरणी झाली. या वर्षात हे क्षेत्र ६ लाख ७८ हजार हेक्टरवर जाईल असा अंदाज आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मका आणि सोयाबीन या महत्त्वाच्या नगदी पिकांना महत्त्व दिले गेले आहे. या दोन पिकांच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. खरीप मक्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ७३ हजार २७ हेक्टर इतके आहे. मागील हंगामात २०१६-१७ मध्ये तब्बल २ लाख १९ हजार ६६९ हेक्टरवर मक्याचा पेरा झाला. यंदाच्या हंगामात हे क्षेत्र अजून वाढून २ लाख २९ हजार ५०० हेक्टरवर जाईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ५७,०१३ हेक्टर आहे. मागीलवर्षी सोयाबीनचा पेरा ६८ हजार हेक्टर झाला. यंदा हा पेरा वाढून ६९ हजार हेक्टरपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
नाशिकच्या नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव, सिन्नर या तालुक्यांत कापसाची लागवड होते. बोंड अळीच्या प्रादुर्भावमुळे या भागातील कापूस पिकाचे नुकसान झाले. कापसाचे अर्थकारणच कोलमडले. शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. येत्या हंगामात कृषी विभागाने बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. मात्र, कापूस उत्पादक अद्याप नुकसानीच्या धक्क्यातून सावरलेले नाही. याचा परिणाम कापसाच्या लागवडीवर होईल.
नाशिक भागात कापसाचे सरासरी क्षेत्र ४७,२१६ हेक्टर आहे. मागील वर्षी ४२,३१४ हेक्टरपर्यंत लागवड झाली होती. यंदा ती फारतर ४३ हजार हेक्टरपर्यंत लागवड होईल असा अंदाज आहे. कापसाच्या लागवडीत यंदा १० टक्क्यांनी घट होईल असा अंदाज आहे.