जळगाव : खानदेशात कांदा दरांवरील दबाव वाढत असून, दर चार ते सहा रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहेत. कांद्याची नाफेडतर्फे खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.
खानदेशात यंदा सुमारे २० हजार हेक्टरवर लागवड झाली होती. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे १४ हजार हेक्टर एवढी लागवड होती. कांदा काढणी सुरू असून, धुळे, पिंपळनेर (ता.साक्री), साक्री, जळगाव, किनगाव (ता.यावल), अडावद (ता.चोपडा), चाळीसगाव या बाजारांमध्ये आवक वाढली आहे. दर्जेदार कांद्याचे उत्पादन यंदा हाती आले आहे. परंतु, दरात मोठा चढउतार सुरू आहे.
एप्रिलच्या सुरवातीला बाजारातील दर ११ ते १२ रुपये प्रतिकिलो, असे होते. परंतु मागील १० ते १२ दिवसांत दरात घसरण सुरू झाली. बाजार समितीत सध्या चार ते सहा रुपये प्रतिकिलोचा दर कांद्यास मिळत आहे. खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे.
दोन एकरांत ३५ ते ४० हजार रुपये खर्च कांदा उत्पादकांना लागला आहे. यानुसार किमान १२ ते १३ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना थेट जागेवर मिळणे अपेक्षित आहे. सध्या कोरोनाचे संकट व इतर कारणांमुळे बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत नाही. पणन साखळी आक्रसली आहे. परराज्यातही कांदा काढणी सुरू आहे.
सरकारने निर्यात, निर्यात शुल्क याबाबत सकारात्मक निर्णय घेतले नाहीत. निर्यातीला प्रोत्साहन नाही. यामुळे नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू व्हायला हवी. सध्या खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मिळून रोज सहा ते साडेसहा हजार क्विंटल कांद्याची आवक सुरू आहे. ही आवक पुढे आणखी वाढेल, अशी माहिती मिळाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.