सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी, फॅबटेक या साखर कारखान्यांनी एफआरपीतील फरकाच्या रकमा थकवल्याच्या निषेधार्थ जनहित शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन सुरु केले होते. परंतु, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सहायक निबंधक पी. सी. दुरगुडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या दोन्ही कारखान्यावर आरआरसी अंतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु होते. देशमुख म्हणाले, ‘‘भैरवनाथ शुगर आणि युटोपियन शुगर या कारखानदारांनी सुरुवातीला दोन महिने शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस द्यावा, यासाठी वाढीव रकमेसह पैसे दिले. डिसेंबर नंतरच्या ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना मात्र जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी पैसे दिले आहेत. यामध्ये पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस दिला आहे. मग हा दुजाभाव शेतकऱ्यांच्या बाबतीत का केला? याबाबतीत येत्या दहा-बारा दिवसांमध्ये जाहीर केल्याप्रमाणे वाढीव रक्कम उत्पादकांच्या खात्यावर जमा केली नाही, तर जनहित शेतकरी संघटना संबंधित कारखान्यात कार्यालयात जाऊन जाब विचारणार आहे.''
तीन दिवसाचे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात रघु चव्हाण, बिरुदेव ढेकळे, बलभीम माळी, पप्पू दत्तू, सुखदेव डोरले, शिवाजी कांबळे, बाळासाहेब नागणे, सर्जेराव गाडे आदी शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलनानंतर दामाजी साखर कारखान्याने त्यांच्याकडील ६०० रुपयांची थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे, असेही सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.