पुणे : जिल्ह्यात गुरुवारपासून (ता.१५) पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारीही (ता.१७) पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली होती. काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. तरीही पावसाच्या कमी झालेल्या सरींमुळे शेतकरीही शेतीकामांसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी शेतीकामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र होते.
सध्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी बुधवारी झालेल्या पावसाने नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. अतिवृष्टीने एकाच दिवसात शेतकऱ्यांकडे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. शेतकऱ्यांना वर्षभर विकत धान्य घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सोयाबीन, भात, कांदा, बाजरी, भुईमूग, ज्वारी, फुलपीके, चारा पिके, मका, तृणधान्ये, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
इंदापूर, बारामती, दौंड, हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यात अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नव्हती. त्यामुळे शेतकरी चांगलाच कोलमडला असून अजूनही पंचनामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे सर्वाधिक ३०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. शिवणे येथे १२.८ मिलिमीटर, तर तळेगाव येथे ११.३ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर, थेरगाव, माले, पिरंगुट, जुन्नर, नारायणगाव, आपटाळे, चाकण, घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर, टाकळी, न्हावरा, मलठण, कोरेगाव, पाबळ, माळेगाव, लोणी, सुपा, राहू, रावणगाव येथे पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या. नुकसानग्रस्त पिकांची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
धरणांतून विसर्ग सुरूच
धरणक्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने अजूनही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. मात्र, विसर्ग कमी असल्याने जिल्ह्यातील मुठा, पवना, मुळा, आरळा, भीमा, इंद्रायणी, नीरा, कऱ्हा, मीना, हंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा धोका काही प्रमाणात टळला होता.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.