अकोला ः शासनाने या हंगामात सुरवातीला हमीभाव व नंतर बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत केलेल्या तूर खरेदीमध्ये प्रचंड घोळ झाल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी झाल्या आहेत. काही तक्रारीची चौकशी करून अहवालसुद्धा बनले. मात्र घोटाळेबाज हे प्रतिष्ठित असल्याने त्याविरुद्ध कुणी कारवाईचे धाडस दाखवले नाही. दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात ठिय्या दिल्यानंतर प्रशासन हादरले.
यामुळे संग्रामपूर केंद्रावर झालेल्या घोळप्रकरणी १२ संचालक, १ प्रभारी व्यवस्थापक व ७ व्यापारी अशा २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.वास्तविक या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व काही शेतकरी सातत्याने कारवाईची मागणी करीत होते. परंतु, कारवाईचा चेंडू इकडून तिकडे फेकल्या जात होता. हे प्रकरण राजकीय वरदहस्तामुळे गुंडाळले जाते की काय, अशीही शक्यता वाढली होती. परंतु, रविकांत तुपकर यांनी सहकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांच्या कक्षात ठिय्या मांडला.
यामुळे उपनिबंधकांपुढे अहवालानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक नव्हता. साहजिकच सहायक उपनिबंधकांनी स्वतः रात्री पोलिस ठाणे गाठले व तक्रार केली. यानंतर अवघ्या काही तासांत तब्बल २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. यातील १२ संचालकांपैकी प्रत्यक्ष किती जणांचा सहभाग होता हा भाग वेगळा असला तरी दोषी असलेले व नसलेल्यांनाही आता पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, एवढे निश्चित झाले.
या हंगामात झालेली तूर खरेदी अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांमध्ये प्रचंड गाजली. अनेक केंद्रावर गदारोळ झाला. सुरवातीला शेगाव केंद्रावरील काहीविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले. अकोल्यातील तूर मोजमापाची चौकशी लावण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यातीलच नांदुरा केंद्रावरील गदारोळाची चौकशी पूर्ण झाली. परंतु, अद्याप याठिकाणी कारवाईचा मुहूर्त निघालेला नाही. संग्रामपूर प्रकरणामुळे आता सर्वच ठिकाणच्या घोळांना उजाळा मिळाला आहे. शिवाय तातडीने कारवाई होण्याची मागणी पुढे आली.
यापूर्वी अकोल्यात बच्चू कडू यांनी तूर मोजमाप व चुकाऱ्यांबाबत जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्याला कोंडले होते. त्यानंतर तूर मोजमाप व चुकाऱ्यांचा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन थेट मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले. एकूणच या घटनांकडे बघितल्यास प्रशासनाच्या चालढकल उघडकीस आणणाऱ्या ठरल्या. शिवाय प्रशासनाचे ‘नाक दाबले तर तोंड उघडते' याचा अनुभव देणाऱ्या ठरल्या.
अकोल्यात तूर खरेदीची चौकशी संपेना
अकोला खरेदी केंद्रावरही घोळ असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तालुका निबंधकांमार्फत चौकशी होत आहे. मात्र, गेली काही महिने ही चौकशीच पूर्ण झालेली नसल्याची वस्तुस्थिती समोर आलेली आहे. या गैरप्रकाराबाबत एखादा ‘ठिय्या' झाला तर लगेच यंत्रणा हलू शकते, असे शेतकरी बोलत आहेत.