कोल्हापूर : ऊस गाळप हंगाम हळूहळू अंतिम टप्प्याकडे जात आहे. सगळ्यात महत्त्वाच्या या टप्प्यात आता कारखाने मजूरटंचाईने बेहाल होत असल्याचे चित्र आहे. शिल्लक राहिलेला ऊस आणि मजूर टोळ्यांची कमतरता यामुळे ऊसतोडणीला गतीच नसल्याची स्थिती आहे.
गेल्या चार दिवसांपासून उन्हाचे प्रमाण वाढू लागल्याने आता मजुरांची क्रयक्षमता घटण्याची शक्यता असल्याने वाढता उन्हाळा हे एक आणखी संकट कारखाना व्यवस्थापनापुढे उभे राहिले आहे. कोल्हापूर विभागातील हंगाम पन्नास टक्क्यांहून अधिक आटोपला आहे.
सध्या बहुतांशी ठिकाणी खोडवा उसाची तोड सुरू आहे. परंतु केवळ साठ टक्केच ऊसतोडणी कामगार उपलब्ध असल्याने याचा प्रतिकूल परिणाम यंदाच्या हंगामावर स्पष्टपणे दिसून येत आहे. याचा ताण तोडणी यंत्रणेवर पडताना दिसतो. कारखान्याच्या अध्यक्षांपासून ते फिल्डमनपर्यंतच्या सर्व यंत्रणा लवकरात लवकर ऊस तोडणी कशी करता येईल याच प्रयत्नात आहे.
अनेक कारखान्यांनी कमी मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर तोडणी प्रतिनिधींच्या बैठक घेतल्या असून शिल्लक ऊस, उपलब्ध तोडणी यंत्रणा याचा अंदाज घेण्यात येत आहे.
कारखान्यांनी हंगामाच्या सुरवातीला झालेल्या बैठकीत यंदा उसाचे उत्पादक कमी असेल असा अंदाज व्यक्त केला. यामुळे जरी यंत्रणा कमी उपलब्ध असली तरी यंदाचा हंगाम फारसा अडचणीचा ठरणार नाही अशी शक्यता होती.
परंतु, मध्यंतरीच्या पावसामुळे उसाच्या वजनात अनपेक्षित वाढ झाल्याने कारखान्यांचे गणित चुकले. त्याचा फटका अजूनही बसत आहे. अजूनही बऱ्याच कारखान्यांकडे तोडणी यंत्रे नाहीत. आणि जी आहेत ती लहान क्षेत्रावर उपयोगात येणारी नाहीत. परिणामी यंदाच्या हंगामात तरी तोडणी यंत्राचा वापर अधिक प्राधान्य देऊन करण्यात कारखान्यांना अपयश येत असल्याची स्थिती आहे.
ऊसतोडणी कामगार कमी असल्याने वेळेत तोड होत नसल्याने शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे. कारखान्यांनी दिलेली तोडणीची तारीख पुढे जात असल्याने उत्पादकांचे पिकांचे वेळापत्रक कोलमडत आहे. वेळेत तोडणी हवी असेल तर पैसे द्या अशी थेट मागणीच होत असल्याने उसाची वेळेत तोड करण्यासाठी पैसे देण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे उत्पादकांनी सांगितले. यामुळे कसेही करून आपला उस कारखान्याला जावा याच प्रयत्नात सध्या ऊस उत्पादक आहे.