सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे १० हजार ६०० टन द्राक्षे युरोपसह आखाती देशात निर्यात करण्यात आली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीत तब्बल दोन हजार टनांनी वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षाची एकूण १५ हजार मेट्रीक टन निर्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
सांगली जिल्ह्यात दरवर्षी निर्यातक्षम द्राक्ष क्षेत्रात वाढ होत आहे. अनेक शेतकरी पाणीटंचाईवर मात करीत दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेण्यास प्राधान्य देत आहे. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी युरोप आणि आखाती देशात द्राक्ष पाठण्यात सरस झाले आहेत. गेल्या पाच वर्षांचा आढावा पाहिल्यास यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून उच्चांकी द्राक्षाची निर्यात झाली आहे. यंदाचा हंगाम १५ एप्रिलच्या दरम्यान, संपण्याची शक्यता असून पंधरा हजार मेट्रीक टन द्राक्षाची निर्यात होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
गेल्यावर्षी १२९१शेतकऱ्यांनी ६७७.८१ हेक्टर क्षेत्राची ऑनलाइन पद्धतीने निर्यातीसाठी नोंदणी केली होती. यंदा यात वाढ होत १९५८ शेतकऱ्यांनी १०३०.५० हेक्टर क्षेत्राची नोंद केली आहे. आजअखेर १० हजार ६०० मेट्रीक टनाची निर्यात झाली आहे. युरोपमध्ये ५९७ कंटेनर तर आखाती देशात ३१६ कंनेटर जिल्ह्यातून रवाना झाले आहेत.
गेल्या काही वर्षांत नियमित द्राक्ष उत्पादनाबरोबरच निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनास प्राधान्य दिले जात आहे. प्रामुख्याने तासगाव, खानापूर, आणि मिरज तालुक्याचा पूर्व भागातील शेतकरी द्राक्ष निर्यात करताहेत. यंदा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन असलेल्या क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र शेतकऱ्यांनी अडचणींवर मात करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.