भवानीनगर, जि. पुणे : साखरसाठ्यावरील नियंत्रण उठविण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करतानाच केंद्र सरकारने आता ५० लाख टन साखरेच्या बफर स्टॉकचा निर्णय घ्यावा, असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, की साखरसाठ्यावर मर्यादा घालून दिल्याने साखरेचे दर घसरत होते. हे एक षड्यंत्र असल्याचे केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्र सरकारने दखल घेत हा निर्णय घेतला. तसा उशिरा हा निर्णय झाला असला, तरी त्याचे परिणाम साखरेच्या दरातील घसरण थांबण्यावर होतील, तेव्हा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी साखर विकण्याची घाई करू नये.
साखरसाठ्याची मर्यादा उठविली म्हणून एकावेळी बाजारात साखर आणू नये. आताची स्थिती पाहता देशात हंगामात २५० लाख टनांपर्यंत साखरेचे उत्पादन होणार आहे. म्हणजेच देशाची गरज पूर्ण करून उरेल एवढे साखर उत्पादन होणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत केंद्र सरकारने आढावा घेऊन साखरेचे दर नियंत्रणात राहण्याकरिता व ऊस उत्पादक शेतकरी व एकूणच साखर उद्योगाचे हित लक्षात घेता सरकारने ५० लाख टन साखरेच्या बफर स्टॉकचा निर्णय घ्यावा.
ही साखर कारखान्यांच्याच गोदामात ठेवून त्यावरील अधिभार केंद्र सरकारने भरावा. यापूर्वी तीन वेळा असा निर्णय घेण्यात आला होता. आताही हा निर्णय घेण्याची गरज आहे.