नगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर २०१८-१९ या वर्षात कांदा चाळीची उभारणी केली. त्याचे अनुदान मिळावे व कांदा चाळ तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून (ता.२३) उपोषण सुरु केले.
मंगळवारीही (ता.२४) ते सुरुच होते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात कृषी विभागाच्या पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने कांदाचाळ उभारणी केली. मात्र, त्यानंतर त्याचे अनुदान देण्याला अद्याप टाळाटाळ केली जात आहे. याबाबत सातत्याने कृषी विभागाशी संपर्क केला असता त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील अनिल विधाते, ॲड. पांडुरंग औताडे, रमेश जगताप, गीताराम रोडगे, नवनाथ मते, बापूसाहेब घोलप, दशरथ चव्हाण, विनायक विधाते, रवींद्र होले यांच्यासह शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे.
अनुदानाबाबत पाठपुरावा केल्यानंतर कृषीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा कांदा चाळ तपासणी करण्याला सुरवात केली. मात्र तपासणीच्या नावाखाली अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. पैसे वसुल करत असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. पैसे घेणाऱ्या कृषीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करावी. रखडलेले अनुदान तातडीने मिळावे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे, ॲड. सयाराम बानकर पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.