नाशिक : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करूनही नाशिक विभागातील हजारो शेतकऱ्यांवर मागेल त्याला शेततळे योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ऑनलाइन अर्ज भरलेल्या ३६ हजार ५२ शेतकऱ्यांपैकी २७ हजार ७३९ शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ न मिळाल्याने अपेक्षाभंग झाला आहे.
२०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन्ही आर्थिक वर्षांत नाशिक विभागासाठी १३ हजार शेततळी निर्मितीचे लक्ष्य होते. मात्र त्यापैकी ८३१३ शेततळी पूर्ण झाली आहेत. याशिवाय ५८० शेततळ्यांची कामे सध्या सुरू आहेत. पूर्ण झालेल्या शेततळ्यांवर आतापर्यंत ३५ कोटी ४८ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान खर्च झालेले आहे. आतापर्यंत एकूण लक्ष्यांकाच्या अवघे ६३.९३ टक्के उद्दिष्ट साध्य झालेले आहे.
या योजनेतून शेततळ्यांच्या कामासाठी आर्थिक अनुदानाच्या अपेक्षेने विभागातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरलेले होते. परंतु, प्रत्यक्षात या योजनेचा लाभ मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे हजारो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
मागेल त्याला शेततळे या योजनेच्या लाभासाठी कृषी विभागाकडे ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या व या योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप कृषी विभागाकडे कार्यारंभ मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. उद्दिष्ट मोठे असूनही कृषी विभागाचे स्थानिक अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरीत असल्याने शेतकऱ्यांची फसगत होत आहे.
या योजनेच्या लाभासाठी हजारो शेतकऱ्यांना कृषी विभागाचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या विभागातील हजारो शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.