फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

बायोमासचे मल्चिंग ऋतुमानानुसार फळबागांसाठी तसेच कुजल्यानंतर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी फायद्याचे आहे. फळबाग वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधार म्हणून प्लॅस्टिक मल्चिंगच्या धर्तीवर बायोमास मल्चिंगसाठी अनुदान रूपात मदत दिल्यास दुष्काळाशी दोन हात करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आधार मिळेल. - विठ्ठल भोसले, डाळिंब उत्पादक, जडगाव, जि. औरंगाबाद.
फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

औरंगाबाद : पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने मराठवाड्यातील फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या आधाराविना धडपड सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून मिळेल तेथून उसाचे पाचट मिळवून त्याचे आच्छादन बागेत करण्याला प्राधान्य देत आहेत. बाग वाचावी यासाठी तज्ज्ञांनी सल्ला दिला असला तरी खरीप, रब्बी वा फळपिकातून फार काही हाती न पडल्याने किती शेतकरी पाचटाची उपलब्धता करून घेऊ शकतील हा प्रश्न आहे.

मराठवाड्यात मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, अंजीर आदी फळपिकांच्या बागा मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यात एक दोन अपवाद वगळता प्रत्येकच जिल्ह्यात पावसाचे प्रदीर्घ खंड व अपेक्षेच्या कसोटीवर पाऊस नापास झाल्याचेच चित्र आहे. त्यामुळे उत्पादन सोडा, अनेक वर्षांपासून जगलेल्या बागा वाचविण्याचे संकट फळबागधारक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला हवं याचं प्रबोधन मोठ्या प्रमाणात झालं आहे. मात्र, पैशांची कमतरता आहे. ज्यांच्याकडे थोडीबहुत आर्थिक सोय आहे त्यांनी सुचविलेले उपाय योजन्यासाठी हालचाली सुरू करताना थेट पश्चिम महाराष्ट्रातून उसाचे पाचट मिळेल तिथून बेल स्वरूपात आणून आपल्या बागांना उपलब्ध पाण्यात वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

औरंगाबादला लागून असलेल्या नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात औरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव, कुंभेफळ, बोकूडजळगाव आदी गावांमध्ये पाचटाच्या आच्छादनासाठी उसाचे पाचट बेल रूपात आणले आहे. एका ट्रकमध्ये कोयत्याने कापलेले जवळपास तीन ते साडेतीन टन तर मशिनने हार्वेस्ट केलेले जवळपास साडेपाच ते सहा टन पाचट आणले जात आहे. कोयत्याने तोडलेल्या उसाच्या पाचटाला बागेतील आच्छादनासाठी शेतकरी प्राधान्य देत आहेत. सुमारे १७०० रुपये टनाने तूर्त हे पाचट मिळत असून त्याला बागेपर्यंत आणण्यासाठी खरेदी किमतीपेक्षा जवळपास दीडपट खर्च शेतकऱ्यांना येतो आहे. 

एक ट्रक पाचट जवळपास १४ ते १५ हजाराला मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. बायोमास मल्चिंगमुळे जवळपास ३५ टक्‍के पाण्याची बचत होते. शिवाय ऋतुमानानुसार फळबागांना फायदेशीर ठरणाऱ्या या आच्छादनाची पावसाळ्यात फळबागेत कुजून सेंद्रिय कर्ब वाढण्यासही मदत होते. त्यामुळे बायोमास मल्चिंगच्या आच्छादनाला शेतकरी प्राधान्य देत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com