ज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का?

यंदा माझ्या शेतीत कपाशीचे क्षेत्र दोन ते तीन एकरांने कमी करणार आहे. पंधरवड्यापूर्वी मका विकला. इतके दिवस थांबूनही त्याला हमीदर मिळाला नाही. त्यामुळे मकाचे चार एकरांपर्यंतचे क्षेत्र घटवून बाजरीचे क्षेत्र वाढविणार. जे पेरू त्याला दर मिळतील का नाही हा प्रश्‍न मनात असतोच. कडधान्याचा पेरा घटण्यामागे न मिळणारे दर हे प्रमुख कारण आहे. - बाबासाहेब काटकर, शेतकरी, कडेगाव, ता. बदनापूर जि. जालना.
खरीप नियोजन
खरीप नियोजन
जालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत आहे. काय करावं कपाशी लावावी की नाही लावावी, लावावी तर किती अन्‌ त्या क्षेत्रात काय पेरावे, गेल्या हंगामात सर्वच शेतीमालाचे पडलेले दर पाहता पुढंही जरी जे पेरू त्याचे दर सुधारतील की नाही आदी प्रश्‍न जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनातील खरिपाच्या तयारीविषयीची तगमग व्यक्‍त करणारे ठरले आहेत. 
 
जालना जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ८७ हजार हेक्‍टर आहे. गतवर्षीच्या खरिपात ५ लाख ७४ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. या क्षेत्रात यंदा किंचित वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन व समाधानकारक पावसाच्या अंदाजामुळे येत्या खरिपात ६ लाख ९ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
 
खरिपात कपाशीची लागवड करावी की नाही, करावी तर किती करावी, कपाशीचे पर्यायी पीक म्हणून समाधानकारक दर नसलेले सोयाबीन वगळता कोणत्या पिकाची निवड करावी याविषयीचे द्वंद्व शेतकऱ्यांच्या मनात आहे. कारण जोपर्यंत उत्पादित शेतीमाल शेतकऱ्यांच्या हातात असतो, तोवर त्याचे दर वाढत नाहीत, तो व्यापाऱ्यांना विक्री केल्यावरच बहुतेक वेळा त्याचे दर वाढतात असा अनुभव शेतकऱ्यांनी सांगितला.
 
त्यामुळे निदान यंदा तरी सरकार शेतीमाल दराचा प्रश्‍न मार्गी लावून शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी धीर देण्याचं काम करेल का हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तूर, मूग,  उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल आदींची खरिपात पेरणी वा लागवड करण्याकडे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल असतो.
 
कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८७ हजार हेक्‍टर असते. त्या तुलनेत गतवर्षी २ लाख ७९ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. परंतु गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यामुळे यंदा कपाशीचे क्षेत्र केवळ २ लाख १ हेक्‍टरवरच प्रस्तावित करण्यात आले आहे. या कपाशीच्या क्षेत्रात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांचे क्षेत्र वाढणे अपेक्षित आहे. 
 
१ लाख ६६ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर असलेल्या जिल्ह्यात आधीच्या हंगामातील ४४ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध होते. नव्याने पुरवठा झालेले खत मिळून ८४ हजार ४४६ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. त्यापैकी २५ हजार ८३९ टन खताची विक्री झाली. ५८ हजार ६०७ मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली. 

जिल्ह्यात बीटी कपाशी बियाण्यांच्या प्रस्तावित २ लाख १ हजार हेक्‍टर क्षेत्रानुसार ८ लाख २८ हजार पाकिटांची गरज आहे. त्यापैकी २ लाख ६० हजार पाकिटे उपलब्ध झाली आहे. बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, आदी वाणांचे जवळपास ५०० क्‍विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. सोयाबीनचे ९१३७ क्‍विंटल बियाणेही उपलब्ध झाले आहे. बियाण्यांचाही गरजेनुसार पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com