
गंगापूर, जि. औरंगाबाद : खरीप हंगाम २०२०-२१ मधील संपूर्ण पिके उध्वस्त होऊनही गंगापूर, खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांचा विमा मंजूर झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गंगापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी(ता.८) अर्धनग्न आंदोलन केले.
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जगन्नाथ पाटील जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात कृषिमंत्र्यांना निवेदन पाठवून न्याय न मिळाल्यास मंगळवारी (ता. ८) गंगापूर कृषी अधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता.
निवेदनानुसार, २०२०-२१ या वर्षात संपूर्ण जिल्ह्यासह गंगापूर, खुलताबाद तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कपाशी, मका, सोयाबीन, बाजरी, मूग, भुईमूग, तूर या पिकांचे नुकसान झाले. ९ नोव्हेंबर २०२० च्या शासन निर्णयाने अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकरी, नागरिकांना मदत देण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांना २७ कोटी २८ लाख रुपये वाटप केले.
सिल्लोड तालुक्यात चौकशी सुरू
औरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत खरीप आढावा बैठक झाली होती. त्यात पीकविमा परताव्याप्रश्नी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्या वेळी या प्रकरणी चौकशीचे आश्वासन भुसे यांनी दिले होते. त्यानुसार चौकशीसाठी अधिकारी बुधवारी (ता.९) सिल्लोड तालुक्यात दाखल झाले. या पथकाने निवड केलेल्या गावांना भेटी देऊन पीक कापणी प्रयोगांविषयी चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.